गजानन ढवसलोकमत न्यूज नेटवर्कविरूर स्टेशन (चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३२ लाख ६८ हजारांच्या शेणखत घोटाळ्यात पाच वनरक्षकांसह दोन वनपालांना मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षकांनी तडकाफडकी निलंबित केल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.
विरूरचे वनपाल संतोष संगमवार, सिद्धेश्वरचे इक्बाल शेख आणि चिंचोलीचे वनरक्षक गोपीचंद राठोड, विरूरच्या अश्विनी ताजने, सोंडा क्षेत्राच्या लक्ष्मी आडे, डोंगरगाव क्षेत्राचे ए. व्ही. मस्तान, सिद्धेश्वरचे वनरक्षक कुंडलिक कोळेकर, अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. 'लोकमत'ने हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर यापूर्वी आरएफओ सुरेश येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले होते.
तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सीमेवरील विरूर वनपरिक्षेत्रात वृक्षलागवड केल्यानंतर वाढीसाठी शेणखत टाकण्याचे नियोजन होते. मात्र, जुलै ते नोव्हेंबर २०२४ मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी शेणखत खरेदी केली नाही. तत्कालीन अधिनस्थ वनपाल व वनरक्षकांशी संगनमत करून बनावट देयके सादर केली. त्याद्वारे विरूर २, चिंचोली ४, कविटपेठ २, भेंडाळा १, सोंडो २, सिद्धेश्वर २, डोंगरगाव १, अशा १४ गवत रोपवनात ३२ लाख ६८ हजार ६०८ रुपयांचा गैरव्यवहार केला. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी चौकशीचा आदेश दिला.
दरम्यान, मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला. अहवालानुसार, दोषी आढळल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले होते. सोमवारी (दि. २) मुख्य वनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी विरूरचे वनपाल संतोष संगमवार, सिद्धेश्वरचे वनपाल इक्बाल शेख यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक बोड्डू यांनी २६ मे २०२५ रोजी वनरक्षक गोपीचंद राठोड, वनरक्षक अश्विनी ताजने, लक्ष्मी आडे, ए. व्ही. मस्तान, वनरक्षक कुंडलिक कोळेकर यांना निलंबित केल्याची माहिती वनविभागाने दिली. निलंबित वनाधिकाऱ्यांची संख्या एकूण आठ झाली आहे.
"मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर व मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या संयुक्त आदेशान्वये दोन वनपाल आणि पाच वनरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे."- एम. बी. दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी, विरूर स्टेशन