मासळ गावात पाणी पेटले
By Admin | Updated: May 5, 2016 01:26 IST2016-05-05T01:26:33+5:302016-05-05T01:26:33+5:30
जिल्ह्यात सूर्याचा पारा वाढल्याने विहिरी व बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे मासळ गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

मासळ गावात पाणी पेटले
तीन महिलांवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल : खासगी विहिरीवरुन दलितांना पाणी नाकारले
चिमूर: जिल्ह्यात सूर्याचा पारा वाढल्याने विहिरी व बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे मासळ गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिढ्यान्पिढ्या भरत असलेल्या खासगी विहिरीवर अचानक दलितांना पाणी भरण्यास मज्जाव करीत गुंड व अन्य साहित्य फेकल्यावरुन तणावाची स्थिती उत्पन्न झाली. एकाच दिवशी मासळ (बु.) येथील तीन विहिरीवर केवळ दलित महिलांनाच मज्जाव करण्यात आल्याच्या कारणावरुन पीडितांनी चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मंगळवारला आरोपींना अटक करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शेगाव भिसी येथील अतिरिक्त पोलीस दल व दंगा नियंत्रण पथक मासळ (बु.) येथे दाखल झाले होते. मात्र गावातील तणावाची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी कुणालाही आजपर्यंत अटक केली नाही. मात्र पोलिसांच्या ताफ्यामुळे मासळ गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
चिमूर तहसील अंतर्गत येणाऱ्या दोन हजार लोकवस्तीच्या मासळ गावात पिण्याच्या पाण्यासाठी महाजल योजनेच्या नळ योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र या नळ योजनेच्या स्रोतात पाणी नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. मात्र या नळ योजनेचे पाणी दलित वस्तीपर्यंत येत नसल्याने येथील दलित वस्तीतील नागरिकांना शेतातील विहिरीवरुन पाणी आणून आपली तहान भागवावी लागते.
आठवड्यापूर्वी या खासगी विहीरधारकांनी पाणी भरण्यास केवळ दलितांना मज्जावच केला नाही तर जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार चिमीर पोलीस स्टेशनला करण्यात आली. त्यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)