जिल्ह्यात पहिली लाट दोन महिने उशिरा; दुसरी लाट आताच थोपवू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:58+5:302021-02-23T04:43:58+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट दोन महिन्यांनी उशिराने आली होती. लाॅकडाऊनचा भयावह काळ तेव्हा अनुभवला. हे ...

The first wave in the district two months late; The second wave can stop now | जिल्ह्यात पहिली लाट दोन महिने उशिरा; दुसरी लाट आताच थोपवू शकतो

जिल्ह्यात पहिली लाट दोन महिने उशिरा; दुसरी लाट आताच थोपवू शकतो

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट दोन महिन्यांनी उशिराने आली होती. लाॅकडाऊनचा भयावह काळ तेव्हा अनुभवला. हे लाॅकडाऊन पुन्हा नकोच, अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यातील नागरिकांची झाली आहे. जानेवारी महिन्यापासून कोरोना पुन्हा हळूहळू डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. ही स्थिती अशीच पुढे कायम राहिली तर जिल्हा प्रशासनाला नाईलाजास्तव लाॅकडाऊन करावे लागणार आहे. यासाठीच मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला वारंवार दिला जात आहे. याबाबत काही संघटनांशी चर्चा केली असता पुन्हा लाॅकडाऊन परवडणारे नाही, असाच सूर उमटला.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या दररोज होणारी रुग्णवाढ बघता ती संख्या ३० च्या घरात आहे. याची सरासरी कोरोना आटोक्यात असल्याचे चित्र आहे. मात्र नागरिकांनी यापुढे स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळले आणि मास्कचा वापर केला तर कोरोनाचा उद्रेक होण्यापासून आताच वाचू शकतो. परंतु आजघडीला जिल्ह्यात ही बाब नागरिकांकडून गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे. हे असेच सुरू राहिल्यास कोरोनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

बाॅक्स

गेल्या आठवडाभरात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर दृष्टी फिरविल्यास १३४ रुग्णांची भर पडल्याचे दिसून येते. दैनंदिन आकडेवारीतही रुग्णसंख्येत अल्प प्रमाणात का होईना वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. ही वाढ अशीच कायम राहिली तर एके दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोट

लाॅकडाऊन हटल्यानंतर बाजारपेठ सुरू झाली. यानंतर लोकांनी कोरोनाला दुर्लक्षित करून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करीत घराबाहेर पडणे सुरू केले. यामुळे पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. काेरोनाला थांबवायचे आहे. लाॅकडाऊन नको असेल तर आम्हाला सुरक्षेच्या नियमांचे कडक पालन करणे गरजेचे आहे.

- हर्षवर्धन सिंघवी, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ काॅमर्स, चंद्रपूर

कोट-

चंद्रपूर जिल्ह्यात काेरोनाची पहिली लाट दोन महिन्यांनी उशिरा आली होती. हा कोरोना बाहेर जिल्ह्यातूनच आला. आता बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाची भीती आहे. त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन परवडणारे नाही. यामुळे मोठे नुकसान उद्योग क्षेत्राला सहन करावे लागले.

- मधुसूदन रुंगठा, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, चंद्रपूर

कोरोनाचे एकूण रुग्ण - २३३६८

बरे झालेले रुग्ण - २२८४३

कोरोना बळी - ३९६

Web Title: The first wave in the district two months late; The second wave can stop now