जिल्ह्यातील ८१ गावांमध्ये प्रथमच होणार ‘विशेष वृक्ष लागवड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:58 IST2019-05-20T22:58:14+5:302019-05-20T22:58:39+5:30
वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढवून गावात हिरवाई निर्माण व्हावी, याकरिता राज्य शासनाने जिल्ह्यातील ८१ गावांचा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान म्हणजे ‘व्हिलेज सोशल ट्रॉन्सफॉर्मेेशन मिशन (व्हीएसटीएम)मध्ये समावेश केला आहे.

जिल्ह्यातील ८१ गावांमध्ये प्रथमच होणार ‘विशेष वृक्ष लागवड’
राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढवून गावात हिरवाई निर्माण व्हावी, याकरिता राज्य शासनाने जिल्ह्यातील ८१ गावांचा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान म्हणजे ‘व्हिलेज सोशल ट्रॉन्सफॉर्मेेशन मिशन (व्हीएसटीएम)मध्ये समावेश केला आहे. या अभियानाद्वारे पर्यावरण व जैवविविधतेचे विविध उपक्रम राबविण्यात सोबतच कृषी, जलसंधारण, रोजगार व कौशल्य विकासाची विविध कामे केली पूर्ण केल्या जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री या अभियानाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.
वनक्षेत्र व वृक्षाच्छादन भौगोलिक क्षेत्रावरून ३३ टक्के करण्यासाठी राज्यात हरित महाराष्टÑ प्रकल्प राबविण्यात येत आहे.
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेनुसार २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात ५० कोटी वृक्षारोपणाचीअंमलबजावणी सुरू आहे. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित झाले.
या मोहिमेंतर्गत वन विभाग, महसूल व ग्रामीण विकास विभागाच्या वतीने मूलभूत सुविधा निर्माण करून शाश्वत विकासाद्वारे गावे सक्षम बनविण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएम) लवकरच सुरू होणार आहे. अभियानाची अंमलबजावणी ग्रामीण सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान या कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८ अंतर्गत गठित झालेल्या संस्थेद्वारे होईल.
असे आहे अभियान
या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या नेतृत्वात दहा हजार झाडांची लागवड होईल. त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कृषी वानिकी योजनेंतर्गत सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोठे क्षेत्र वनशेतीखाली आणून शेतकऱ्यांना प्रक्रिया व पणनसाठी मदत केल्या जाईल. याशिवाय जलयुक्त शिवार अभियान, मृद व जलसंधारण, शिक्षण, पुणे जिल्ह्यातील रानमाळा गावाच्या धर्तीवर वृक्ष लागवड संगोपन, कौशल्यविकास व उपजिविका, कन्या वनसमृद्धी योजना, मनरेगा, हरित सेना नोंदणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन विशेष निधी देणार असून ग्रामस्थांच्या सुचनेनुसारच ग्रामविकास आराखडा तयार होईल. ग्रामपंचायत स्तरावर एक कृती दल स्थापन होणार आहे.
मूल, कोरपना तालुक्यात सर्वाधिक गावे
अभियानाकरिता कोरपना व मूल तालुक्यातील सर्वाधिक प्रत्येकी २० गावांची निवड झाली आहे. पोंभुर्णा १२, नागभीड ८, जिवती, राजुरा व चिमूर ६, चंद्रपूर तालुक्यातील चेक निंबाळा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत विकासाची कामे केली जाणार आहे. यामध्ये चिमूर तालुक्यातील काजळसर, कवडशी दे., लोहारा, चक जातेपूर, लोहारा चक व लावेरी. जिवती तालुक्यातील माराई पाटण, रेहपल्ली, धनकदेवी, जांभुळधरा, खारगाव खुर्द. व मरकागोंधी धनक. कोरपना तालुका - अकोला, चनई बु., धानोली, धानोली तांडा, चनई खु., जेवरा, तांबाडी, तुळशी, कवठाळा, कोराडी, चोपन, मांडवा, तांगडा, मांगुलहिरा, थिप्पा, उमरविहिरा, खडकी (रूपापेठ), रूपापेठ, हेटी व शेरज बु. मूल तालुका - बाबराळा, भादुर्णी, पळझरी, पळझरी चक, शिवापूर चक, बोरचांदली, दाबगाव मक्ता, दाबगाव तु., गोवर्धन, हळदी गावगन्ना, हळदी तु., चक काटवन, चिंचोली, कारवा, कोसंबी, नांदगाव, चेक बेंबाळ, चक घोसरी, पिपरी देशमुख व उथळपेट. नागभीड तालुका - गोविंदपूर, खरबी, काचेपूर, नांदेड, हुमा खडकी, किटाळी, बोरमाळा, कासर्रा, कोरंबी, कुनघाटा, पांढरे बरड व रत्नापूर. पोंभुर्णा तालुका - आष्टा, सोनापूर, चक बल्लारपूर, चक फुटाणा, दिघोरी, घाटकुळ, जामखुर्द, चक नवेगाव, नवेगाव मोरे, पिपरी देशपांडे, उमरी पोतदार व उमरी तुकूम. राजुरा तालुका - बांबेझरी, नोकारी बुज़ व नोकारी खुर्द. भद्रावती तालुका - मोहर्ली.