लोकसूचनांतून आकारास आलेला पहिला अर्थसंकल्प
By Admin | Updated: April 11, 2016 00:57 IST2016-04-11T00:55:18+5:302016-04-11T00:57:48+5:30
लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य या संकल्पनेवर राज्याच्या इतिहासात प्रथमच लोकांच्या सूचनांवर आधारित अर्थसंकल्प तयार करण्यात आला.

लोकसूचनांतून आकारास आलेला पहिला अर्थसंकल्प
सुधीर मुनगंटीवार : अर्थसंकल्पाचे अचूक व काटेकोर विश्लेषण
चंद्रपूर : लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य या संकल्पनेवर राज्याच्या इतिहासात प्रथमच लोकांच्या सूचनांवर आधारित अर्थसंकल्प तयार करण्यात आला. त्यामुळेच सर्व घटकांना समान न्याय हे या वर्षीच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प आकारास आला आहे. काटकसर म्हणजेच उत्पन्न या सूत्राने अर्थव्यवस्था सशक्त व मजबूत करण्याचा संकल्प करु या, अशा अचुक शब्दात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शनिवारी ज्ञानज्योती विचार मंचातर्फे आयोजित अर्थसंकल्पाचे विश्लेषण या कार्यक्रमात ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे अध्यक्षस्थानी होते. महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, रवी भागवत व सपना मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. अतिशय सोप्या व सुरेख भाषेत ना. मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. पैशाची काटकसर करणे हे उत्तम अर्थमंत्र्यांचे कर्तव्य असते, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. राज्याचा अनुत्पादक खर्च वाढत होता, महसुली तूट वाढत होती. तरीही ३२२ दिवसात राज्याचा विकास दर ५.८ वरुन ८ टक्के इतका झाला. म्हणजे २.२ टक्क्यांची वाढ झाली. अर्थसंकल्प जनतेचा असावा, यासाठी लोकांच्या सुचना मागविल्या होत्या. नागरिकांनी अतिशय उपयुक्त अशा तीन हजारावर सुचना केल्या. त्यातील काही सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. लोकसूचनांचा समावेश असलेला देशातील हा पहिला अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगाराच्या सर्वाधिक म्हणजे ५० टक्के संधी कृषी क्षेत्रात आहेत. ज्या देशात शेती जास्त असेल, तोच देश २०३० मध्ये जगात श्रीमंत असणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. वास्तविक ही तरतूद २६ हजार ९८१ कोटींची आहे. २०१२-१३ मध्ये ही तरतूद १५ हजार कोटींची होती. आता ती २६ हजार ९८१ कोटी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे निसर्ग संपन्नता आहे. पावसाचा थेंब न थेंब वाचविल्यास आपला देश जगाचा पोशिंदा बनेल असे ते म्हणाले.
महिलांसाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असल्याचे ते म्हणाले. राज्य महामार्गावर दर शंभर किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येतील. त्यांचा दर्जा उत्तम ठेवण्यात येणार आहे. पाहिल्या टप्प्यात शंभर स्वच्छतागृह बांधले जातील. महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरु केली जाईल.
मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समिती गठीत केली जाईल. स्वत: च्या घरादाराची पर्वा न करता आपल्यासाठी ज्यांनी देशाची सेवा केली, त्या स्वातंत्रसंग्राम सैनिकांना हक्काच घर मिळावे, यासाठी योजना केली व यात त्यांना १० लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल. येणाऱ्या चार वर्षात कृषी रस्ते, पांदण रस्ते करण्याचा निर्णय केला.
१ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा जागतिक विक्रम आपण करणार आहोत. या उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन वृक्ष लावावेत व ते जगवावेत, असे आवाहन त्यांनी केले. आदर्श अंगणवाडी योजनेत १० हजार अंगणवाडया आदर्श करण्यात येणार आहेत. यासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)