अखेर वादग्रस्त ‘पोपट’ वनविभागाच्या कोठडीतून मुक्त
By Admin | Updated: September 7, 2015 01:17 IST2015-09-07T01:17:39+5:302015-09-07T01:17:39+5:30
राजुरा येथील वादग्रस्त पोपटाची अखेर वन विभागाने सुटका केली असून त्याला उडवून देण्यात आले आहे.

अखेर वादग्रस्त ‘पोपट’ वनविभागाच्या कोठडीतून मुक्त
राजुरा : राजुरा येथील वादग्रस्त पोपटाची अखेर वन विभागाने सुटका केली असून त्याला उडवून देण्यात आले आहे.
शिवीगाळ करणाऱ्या पोपटाची राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार झाली होती. तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आल्यानंतर राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे यांनी हा पोपट वन विभागाच्या हवाली केला. वन विभागाच्या ताब्यात असताना मागील १५ दिवसांपासून तो विविध पदार्थांवर ताव मारत होता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी मिरची, पेरू, डाळींब यासारखे खाद्य पदार्थ पोपटाला दिल्या जात होते. पोपटाच्या देखरेखीसाठी एक वन विभागाचा कर्मचारी ठेवला होता.
मागील १५ दिवसांपासून वन विभागाच्या कोठडीत असेलेला बंदीस्त पोपट ४ सप्टेंबरला मुक्त झाला. त्याला राजुरा वन विभागातील खांबाडा बीटामध्ये सोडून देण्यात आला. राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपटाला वन विभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले असून मागील अनेक दिवसांपासून बंदिस्त असलेला पोपट आता मोकळ्या हवेत श्वास घेणार आहे. तो आपले उर्वरित आयुष्य मोकळ्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात घालविणार आहे.
पोपटाबाबत काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोपट जंगलात सोडल्यामुळे अधिकाऱ्यांनीसुद्धा सुटकेचा श्वास घेतला आहे. या पोपट्या कारनाम्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर रंगली होती. (शहर प्रतिनिधी)