मुहूर्तावर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा सत्कार
By Admin | Updated: May 6, 2016 01:01 IST2016-05-06T01:01:03+5:302016-05-06T01:01:03+5:30
येथे वेळेवर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बुधवारी सत्कार केला.

मुहूर्तावर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा सत्कार
राजुरा : येथे वेळेवर लग्न लावणाऱ्या वर-वधू पित्याचा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बुधवारी सत्कार केला.
सध्या सर्वत्र लग्न समारंभाचा धूमधडाका सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यासाठी ज्योतिष्य, पंडितांकडून मुहूर्तसुद्धा काढून घेत आहेत. मुहूर्तावर सर्व पाहुणे मंडळी येतात. परंतु नवरदेव वऱ्हाड घेऊन वेळेवर लग्न मंडपात पोहचत नसल्याने कडाक्याच्या उन्हात वर-वधू पक्षाकडील पाहुण्यांना ताटकळत रहावे लागते. पर्यायाने वेळ वाया जातो. काही लग्ने साग्रसंगीत असतात. त्यामुळे वऱ्हाड्यांचे मनोरंजनही होते. परंतु जे लोक वेळ काढून लग्नाला आलेले असतात. त्यांना अकारण तासन्तास ताटकळत बसावे लागते. विशेषत: मोठा समाज म्हणून ज्या कुणबी समाजाकडे पाहिले जाते, त्या समाजातीलही लग्न वेळेवर लागत नाहीत, अशी चर्चा असते. परंतु राजुरा येथे बुधवारी माधवराव रासेकर यांचे चिरंजीव आशिष व गडचांदूर येथील विठ्ठलराव थिपे यांची कन्या शितल यांचा विवाह तंतोतंत मुहूर्तावर लावण्यात आला. त्यामुळे या लग्न समारंभाला उपस्थित असलेले राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दादा पाटील लांडे यांच्याशी चर्चा करून समाजात या निमित्ताने चांगला संदेश जावा, यासाठी वर व वधू पित्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)