असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचे उपोषण
By Admin | Updated: December 21, 2015 01:08 IST2015-12-21T01:08:28+5:302015-12-21T01:08:28+5:30
आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे अधिवेशनात उपोषण सुरू केले आहे.

असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचे उपोषण
चंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे अधिवेशनात उपोषण सुरू केले आहे. कार्यक्रमातील कामावरुन कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, राष्ट्रीय पॅलिटिव्ह केअर कर्मचाऱ्यांना इतर राज्याप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात यावा, कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी भरतीची जाहिरात काढणे बंद करावे यासह विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम नागपूर उपोषण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत उपोषण मंडपास विरोधी पक्ष नेते रामधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, ना. राजे अमरीश आत्राम, आदिवासी विकास राज्यमंत्री आ. देवराव होळी, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अमित देशमुख यांनी भेटी देऊन शासन दरबारी मागण्या लावून धरण्याचे आश्वासन दिले.
उपोषणादरम्यान सहसंचालक डॉ.साधना तायडे, संजीव जाधव, सहसंचालक यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. परंतु मागील चार महिन्यापासून संघटनेची दिशाभूल केली असल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे पुढे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नीलेश सुभेदार, रवींद्र गोरडवार, विवेक वनकर, सिमेंद्र आवळे, देवेंद्र पिंपळकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)