तिसऱ्या दिवशीही दखल नाही : कर्मचाऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा
चंद्रपूर : लोककल्याण बहूद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे पालन पोषण करणे संस्थेला कठीण जात आहे. दरम्यान, १८ वर्षांच्या वरील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी संस्थेवर आहे. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे, या मागणीसाठी २५ जानेवारीपासून विद्यार्थ्यांसह संस्था पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस झाले असतानाही अद्यापही शासन तसेच प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आता कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष
, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून, प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे.
स्वतंत्र भारतात गतिमंद शासनाच्या धोरणामुळे गतिमंद विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याची दुर्दैवाची बाब असल्याचे मत संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी व्यक्त केले असून, जोपर्यंत शासन यावर ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
शासनाने संस्थेला मान्यता दिली आहे; मात्र अनुदान दिले नाही. दरम्यान, नियमानुसार १८ वर्षे वयाचे विद्यार्थी झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे; मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नाइलाजाने या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी संस्थेवर आली आहे. त्यामुळे उसनवारी करून विद्यार्थ्यांचा खर्च भागवला जात आहे; मात्र आता संस्थेवर कर्जाचा डोंगर उभा होत असल्याने या अनाथ असलेल्या विद्यार्थ्यांची शासनाने जबाबदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणाला आमदार जोरगेवार यांनी भेट दिली असून, जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, येथील कर्मचाऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.