बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 05:00 AM2021-06-13T05:00:00+5:302021-06-13T05:00:11+5:30
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे. ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोरीची किंमत मागील वर्षी २२६० रुपये होती. यंदा ती ३२०० रुपये झाली आहेत. धान सहाशे ते सातशे रुपये झाले आहेत.
वसंत खेडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बियाण्यांच्या किमती दरवर्षी वाढत जात आहेत. यंदाही त्या बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत. वाढलेला हा खर्च कसा पेलायचा, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या सोबतच बोगस बियाणे हा संभाव्य धोकाही त्यांना अस्वस्थ करतो आहे.
यंदा पाऊस दमदार बरसणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्याचप्रमाणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे. ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोरीची किंमत मागील वर्षी २२६० रुपये होती. यंदा ती ३२०० रुपये झाली आहेत. धान सहाशे ते सातशे रुपये झाले आहेत. त्याप्रमाणे सर्व बियाण्यांचे भाव ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. कितीही किंमत वाढली तरी बियाणे खरेदी करणे आहेच. दुसरा पर्याय नाही. कसेही करून बियाणे घेतले तरी दुसरा एक धोका कास्तकारांना पुढे बोगस बियाण्यांचा असतो. खर्च करून बियाणे विकत घेतले आणि कष्ट करूनही ते उगवले नाही. उगवले तरी त्यावर फुल-फळ उगवले नाही तर वर्षभराची मेहनत वाया जाते. सारे नियोजन कोलमडून जाते. असा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. तरीही मोठ्या आशेने कास्तकार पेरणी करीत आहेत.
गतवर्षी बियाणे उगवले; मात्र फळधारणा नाही
येथील प्रगतशील कास्तकार राजू शर्मा यांनी गतवर्षी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. झाड उगवले पण फळ जेमतेमच आले. निराशा होऊन त्यांनी त्यावरून ट्रॅक्टर चालविला. असे अनेक ठिकाणी घडले आहे. बोगस बियाणाबाबत कास्तकारांकडून कृषी विभागाकडे तक्रारी केल्या जातात. मात्र पुढे त्यांचे काहीच होत नाही. असे याबाबत सात शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्याकडून कास्तकार नागविले जात राहतील. कास्तकारांना निसर्ग आपत्तीला तोंड द्यावे लागतेच. सोबतच अशा प्रवृत्तीच्या लोकांपुढे त्यांचे अतोनात नुकसान होते.
बोगस बियाणे कसे ओळखायचे?
खरेदी करून आणलेल्या बियाणांच्या पिशवीतून मूठभर दाणे पाण्यात भिजवून ओल्या कपड्यात हवेशीर जागेत तीन दिवस ठेवायचे. चवथ्या दिवशी त्या सर्वांमधून अंकुर फुटले तर ते पेरणीयोग्य समजावे. कृषी विभागाकडूनही ही पद्धत सांगितली जाते. प्रचलित दुसरी पद्धत अशी म्हणजे बादलीतील पाण्यात बियाणे टाकायचे. थोड्या वेळाने जे तळाशी बसतील, ते योग्य, वर तरंगणारे अयोग्य. या दोन्ही पद्धती वेळ जात असला तरी त्यामुळे धोका टाळता येतो.