कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागले

By Admin | Updated: October 18, 2015 01:01 IST2015-10-18T01:01:16+5:302015-10-18T01:01:16+5:30

वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत.

Farmers will be frustrated with low-pressure electricity supply | कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागले

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागले

शेतातील मोटारपंप झाले निकामी : रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता
गोवरी : वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागत आहे. खंडीत वीज पुरवठा व सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.
राजुरा तालुक्यातील राजुरा वीज वितरण विभागांतर्गत गोवरी परिसरातील अनेक गावांतील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या रब्बी हंगामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज वितरण कंपनी जनतेवर भारनियमनाचा बडगा उगारत आहे. या अघोषित भारनियमनाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. गोवरी, पोवनी, चिंचोली, माथरा, अंतरगाव, गोयेगाव, साखरी, वरोडा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या शेतातील पिकांना मोटारपंपाच्या साहाय्याने पाणी द्यायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती बल्बही सुरू होत नाहीत. एवढ्या कमी प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरण शोभेची वस्तू झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने लाख रुपये खर्च करून शेतात लावलेले मोटारपंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. विजेचा कमी प्रमाणात वापर होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल पाठविले जाते. एकीकडे वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे जादा वीज बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शेतपिकांना सध्या सिंचनाची आवश्यकता आहे. दिवस-रात्रं कष्ट करून फुलविलेली पिके पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जातात. मात्र कमी वीज दाबाच्या पुरवठ्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. वीज पुरवठा कधीही बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतात हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकरी वीज येण्याची आतूरतेने वाट पाहतात. मात्र वीज येत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. याकडे वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

वीज वितरण कंपनीकडून कमी वीज दाबाचा पुरवठा करण्यात येत असल्याने शेतातील मोटारपंप सुरू होत नाही. परिणामी शेतातील पीक पाण्याअभावी सुकायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रबी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
- भास्कर जुनघरी, शेतकरी, गोवरी
विरूर (स्टेशन) येथील वीज उपकेंद्रातून ३३ के.व्ही. चा वीज पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने कमी वीज दाबाची समस्या निर्माण झाली आहे.
- श्रीनिवास बडगू, सहायक अभियंता (ग्रामीण), राजुरा

Web Title: Farmers will be frustrated with low-pressure electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.