शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाडांवरच !
By Admin | Updated: December 21, 2014 22:55 IST2014-12-21T22:55:48+5:302014-12-21T22:55:48+5:30
सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच

शेतकऱ्यांचे पांढरे सोने झाडांवरच !
वेचा परवडणार कसा ? : कापसाला भाव नाही अन् वेचणीचे भाव कडाडले
रवी जवळे - चंद्रपूर
सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी कसाबसा कापूस जगविला, त्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूरच मिळेणासे झाले आहे. जे मजूर मिळतात, ते आठ ते दहा रुपये प्रति किलो मजुरी घेत आहेत. कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना हा वेचणीचा दर परवडणारा नाही. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावातील कापूस झाडांवरच लोंबकळत असून कापूस उत्पादकांचा जीवही टांगणीला लागला आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांच्या माथ्यावर कर्ज लादून गेला आहे. या कर्जाच्या दडपणाखालीच यंदा पुन्हा शेतकऱ्यांनी कर्जाचे ओझे डोक्यावर ठेवत शेती केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे. उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांचे खिशे आधीच फाटलेले आहेत. अशातच संपूर्ण जिल्ह्यातच मजुरीचे दर कडाडले आहेत. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, गोंडपिपरी हे कापसाचे तालुके आहेत. या तालुक्यात शेवटचा कापूस झाडांवर आहे. मात्र कापूस वेचणीसाठी काही ठिकाणी सहा ते आठ तर काही ठिकाणी आठ ते दहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. आधीच खिसे फाटले असल्यामुळे एवढी मोठी मजुरी लावून कापूस वेचायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
यावर्षी कापसाला तीन हजार ८०० रुपयापर्यंत भाव आहे. एकतर कापसाला भाव नाही आणि मजुरी महाग अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस वेचला. मात्र आता कापसाला भाव येईल, या आशेने तो साठवणूक करून ठेवला आहे. मात्र ज्या मजुरांनी कापूस वेचला त्याची रक्कम देण्यासाठी कापूस कवडीमोल भावात विकल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. हा प्रकार लक्षात येताच बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस झाडावरच ठेवला आहे. शिवाय जो नगदी मजुरी देईल, त्याच्याकडेच जाणे मजूरवर्गही पसंत करीत आहेत.
विशेष म्हणजे, बाहेर गावातून मजूर आणण्याकरिता आणि परत सोडण्याकरिता आॅटो, मिनीडोअर करावा लागतो. ही विवंचनादेखील शेतकऱ्यांपुढे आहे. १०० टक्के कापूस वेचायला झाल्याने मजुरांचीही सध्या कमतरता भासत आहे. याच संधीचा फायदा घेत मजुरांनीही मजुरीची दर वाढविल्याचे समजते. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे पांढरेसोने सध्यातरी झाडांवर टवटवित दिसत असले तरी शेतकऱ्यांचा चेहरा आताच कोमेजलेला दिसून येत आहे. काही दिवसात कापसाचे भाव शासनाने वाढविले नाही तर शेतकऱ्यांचा अखेरचा कापूसही शेतातच संपुष्टात येणार आहे.
कापूस वेचणीचे यंत्र हवे
दिवसेंदिवस मजुरीचे दर वाढत आहे. मात्र कापसाला प्रतिक्विंटल भाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी खचून गेला असून शेतीविषयक दृष्टिकोन बदलू लागला आहे. आता उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आहे.
ंया गावात आहे झाडांवर कापूस
वरोरा तालुक्यातील भेंडाळा, चारगाव, केमक, वरार, मोहबाळा, दहेगाव, चरूरखटी, मारडा, मजरा, चिनोरा, भद्रावती तालुक्यातील नंदोरी, धानोली, चरूर, पावना, डोंगरगाव, भटाळी, पान वडारा, टाकळी, कोंढा, मानगाव तोराणा, कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, गोंडपिपरी तालुक्यातील वढोली, खरारपेठ, धाबा, भंगराम तळोधी, लाठी, तोहोगाव, पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे, भिवनी, बामणी, चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, वडा आदी गावातील शेतात मजुरांविना कापूस झाडांवरच लोंबकळत आहे.