शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:36 IST2018-02-19T00:36:08+5:302018-02-19T00:36:30+5:30
शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला.

शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल
प्रकाश काळे।
ऑनलाईन लोकमत
गोवरी : शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. यामुळे या भागातील शेतकºयांचे पांढरे सोने मातीमोल झाले आहे.
शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या रब्बीपिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला तर शेतकऱ्यांचे नगदी पिक समजले जाणारे कापूस वादळाच्या प्रचंड वेगाने झाडावरून उडाले. यावर्षी कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांअभावी कापसाची वेचणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा कापूस झाडावरच लोंबकळत राहिला. परिणामी कापूस झाडावरच उन्हाने सुकायला लागल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले होते. कापूस वेचणीला मजूर नसल्याने शिवार कापसाचे पांढरे रान झाल्याचे सर्वत्र दिसत होते. अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी आर्थिक सकटात सापडला असतानाच निसर्गाने शेतकऱ्यावर घाला घातला. अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांना खाल्यानंतर रब्बी पिकांनाही निसर्गाचा जबर तडाखा बसला. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्ग कोपल्याने हिरावून गेला आहे.
दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आता निसर्गानेही साथ सोडली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उभे राहायला तयार नाही. सारी परिस्थितीच शेतकऱ्याच्या विरोधात उभी ठाकल्याने शेतकऱ्यांना आज कोणाचाही आधार उरला नाही.