बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:38+5:302021-03-23T04:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : पुढील हंगामाकरिता बाजारामध्ये कापूस पिकाचे बोगस व अनधिकृत बियाणे आले आहे. आरआरबीटी, एचडीबीटी या ...

बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : पुढील हंगामाकरिता बाजारामध्ये कापूस पिकाचे बोगस व अनधिकृत बियाणे आले आहे. आरआरबीटी, एचडीबीटी या नावाने अनोळखी व्यक्तीकडून शेतकऱ्यांना बियाण्याची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अनधिकृत विक्रेत्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
हे बोगस बियाणे जमीन पर्यावरण व आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे वाण तंत्रज्ञान किंवा शिफारस याची माहिती नसते. या बियाण्यांवर तणनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कॅन्सर, मुत्रपिंडाचे आजार मनुष्याला होतात. पर्यायाने शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होऊन मानवी आरोग्यालाही हानी पोहोचते. बोगस बियाण्याचे पक्के बिल दिले जात नसल्यामुळे फसवणूक झाल्यास कोणतीही भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना परवानाधारक अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करून त्याचे पक्के बिल घ्यावे. यासंदर्भात काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश व पंचायत समिती कृषी अधिकारी जे. एस. धात्रक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.