आॅनलाईन सातबारासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:48 IST2016-04-02T00:48:14+5:302016-04-02T00:48:14+5:30
भारत हा कृषिप्रधान देश आहे. तसेच हा खेड्यांचा शेतकऱ्यांचा देश आहे. या देशात ८० टक्के शेती आहे.

आॅनलाईन सातबारासाठी शेतकऱ्यांची धावपळ
१५ दिवस लागणार : पटवाऱ्याच्या रेकॉर्डनुसार सातबाराचे वाटप
भिसी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. तसेच हा खेड्यांचा शेतकऱ्यांचा देश आहे. या देशात ८० टक्के शेती आहे. शेतीवर उपजीविका करणारे शेतकरी सर्व खेडेगावातील आहेत. पण या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून या ना त्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा या शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. अशातच आता आॅनलाईन सातबारासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
शेतकऱ्यांनी ज्या दिवशी अर्ज केला त्याच दिवशी सातबारा मिळत नाही. चार-पाच दिवसानंतर सातबाराची झेरॉक्स प्रत मिळते. चिमूर तालुक्यात २५९ गावांची संख्या असून या सर्व गावांतील कृषी क्षेत्र ३६ हजार ३६० हेक्टर आर. चौरस किलोमीटर आहे.
एकूण ४० तलाठी या सर्व साज्यांचे काम सांभाळतात. सर्व तलाठ्यांनी आपला शेतीचा पूर्ण दस्ताऐवज तहसीलमध्ये जमा केल्याने व आॅनलाईन सातबारा तहसीलमधून मिळते, अशी शेतकऱ्यांची खात्री झाल्याने सातबारासाठी शेतकरी तहसीलमध्ये एकच गर्दी करू लागतात. ३१ मार्च पूर्वी शेतकऱ्यांना सोसायटी किंवा बँकेचे पीक कर्ज मिळविण्यासाठी सातबारा द्यावा लागतो. सध्या शेतकऱ्यांना सातबाराची झेरॉक्स प्रत मिळत असल्याने भर उन्हातही त्यांची धावपळ होताना दिसत आहे.
तहसीलमध्ये नायब तहसीलदारांची तीन पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. परिणामी तहसीलमधील इतर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे आॅनलाईन सातबारासाठी उशीर होत असल्याचे तहसीलदार महल्ले यांनी सांगितले.
आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने भर उन्हात सातबारासाठी धावपळ करावी लागत असल्याने त्रास होतो. असे मालेवाडा मांगलगाव, सावरगाव इतर गावातील शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले. यापूर्वी तलाठ्याकडे गेले की लगेच सातबारा मिळायचा. धावपळ, गर्दी नसायची. आता तर रांगेमध्ये उन्हातान्हात उभे राहावे लागते. पूर्वीप्रमाणे पटवाऱ्याकडून सातबारा मिळावा, अशी अपेक्षाही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
आॅनलाईन सातबारा देण्यासाठी संगणकामध्ये काही त्रुटी असल्यामुळे व काम पूर्ण न झाल्यामुळे अडचण येत आहे. सध्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तलाठ्याच्या रेकॉर्डनुसार झेरॉक्स प्रत काढून सातबारा देण्यात येत आहे. तसेच ३१ मार्चचा विचार करून शेतकऱ्यांना सातबारा देण्यासाठी होळीनंतर शुक्रवार, शनिवार व रविवार सुटी असताना कार्यालय सुरू होते. येत्या १५ दिवसांत त्रुट्या दूर झाल्या की, आॅनलाईन सातबारा देण्यात येईल.
- संतोष महल्ले, तहसीलदार