तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी
By Admin | Updated: November 15, 2015 00:45 IST2015-11-15T00:45:06+5:302015-11-15T00:45:06+5:30
कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.

तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी
कोरपना : कापूस संकलन केंद्र लवकर सुरू करण्यात येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला. परंतु, शासनाला आतापर्यंत मुहुर्तच सापडला नसल्याचे दिसते. कापूस कुठपर्यंत घरीच ठेवायचा, या चिंतेत शेतकरी आहेत. याचा फायदा घेत तेलंगणातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत.
कापूस खरेदीबाबत शासन उदासीन असल्याने दिसते. त्यामुळे येथे अद्याप कापूस संकलन केंद्र सुरू झाले नाही. पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जास्त प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. पावसाने यावर्षी सुरूवातीला शेतकऱ्यांना झोडपले, त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्ह्यात पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका शेतपिकांना बसला. कोरड्या दुष्काळाने शेतपिकांची पुरती वाट लागली. शेती पिकली नाही तर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत होता. कसेतरी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पीक भरीस आल्यावर रोग पडल्याने कपाशीची झाडे वाळायला लागली होती. यावर उपाययोजना करीत शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी केली. एवढा आर्थिक भुर्दंड सोसून पीक आता हाती आले, तर विक्रीची चिंता त्यांना लागली. शासनाचे खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
खासगी व्यापारी बेभाव कापसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला.
शासनाने हमीभाव जाहीर केला. हा हमीभाव तोकडा आहे. शासन कापूस दरवाढीसंदर्भात विचार करून जास्त भाव जाहीर करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शासनाने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. उलट कापूस संकलन केंद्रही सुरू केले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावात घेण्याची संधी मिळाली आहे. आंध्रातील व्यापारी या संधीचा फायदा उचलण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ते कापूस खरेदी करीत आहेत. दारातच कापूस विकला जात असल्यामुळे कमी भावात द्यावा लागत आहे. खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत कापसाची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. आता मालाची खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. त्यासाठी तेलंगणाचे व्यापारी येथे येत आहेत. (शहर प्रतिनिधी)