शेतकर्यांची धावपळ हंगामाची तयारी
By Admin | Updated: May 19, 2014 23:25 IST2014-05-19T23:25:08+5:302014-05-19T23:25:08+5:30
खरीप हंगाम जवळच येऊन ठेपला आहे. हंगामाच्या तयारीसोबतच बी-बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी बँक, सावकारांकडे कर्ज घेण्यासाठी शेतकर्यांनी धावपळ सुरू केली आहे.

शेतकर्यांची धावपळ हंगामाची तयारी
कर्ज मिळविण्यासाठी बँंकेकडे चकरा
चंद्रपूर : खरीप हंगाम जवळच येऊन ठेपला आहे. हंगामाच्या तयारीसोबतच बी-बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी बँक, सावकारांकडे कर्ज घेण्यासाठी शेतकर्यांनी धावपळ सुरू केली आहे. निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या काही शेतकर्यांवर बँकांचे कर्ज थकीत आहे. काही शेतकरी जुळवाजुळव करून थकीत कर्ज भरीत आहेत. तर नवीन कर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही बँकेत शेतकर्यांची अडवणूक होत असल्याचे समजते. उत्पन्नापेक्षा पिक घेण्याचा खर्च वाढला आहे. रासायनिक खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून तो खर्च न झेपाविणारा आहे. शेतकर्यांना आर्थिक जुळवाजुळव करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. ज्या शेतकर्यांनी श्रमाचा पै-पै बँकेत जमा केला. तो पैसा बँक गरजेच्यावेळी देत नाही. असे असताना शेतकर्यांच्या प्रश्नांना बगल देत राजकीय मंडळी पोळ्या शेकण्यात व्यस्त आहेत. शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिला जात नाही. व्यापार्यांच्या गोदामात पोहोचलेल्या शेतमालाचे भाव वाढत आहेत. या विसंगतीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. सहकारी सोसायटी कर्ज देऊ शकत नाही. राष्टÑीयकृत बँका सहजासहजी शेतकर्याला कर्ज देत नाही. दिलेच तर, कागदपत्रे गोळा करताना त्याची दमछाक होते. शेतीचे भाव कितीही वाढले असले तरी, त्या शेतीवर शेतकर्याला नाममात्र कर्ज मिळते. त्यामुळे वर्षभर आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस बियाणे, खते, किटकनाशकांचे दर वाढत आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसत नाही. निंदण, खुरपणासाठी पैसा राहत नाही व शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्नही होत नाही. त्यातही निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यामुळे तो संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतमालाला योग्य भाग आणि मूबलक कर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. (नगर प्रतिनिधी)