शेतकऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:44 IST2017-07-19T00:44:32+5:302017-07-19T00:44:32+5:30
तालुक्यातील डोंगर्ला येथील लघुसिंचन विभागाद्वारे ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी लघुसिंचन विभागाने हस्तांतरित केल्या.

शेतकऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर
कुटुंबासह घेराव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील डोंगर्ला येथील लघुसिंचन विभागाद्वारे ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी लघुसिंचन विभागाने हस्तांतरित केल्या. मात्र मागील १४ वर्षांपासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित आहेत. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने सदर शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, याकरिता अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता उपविभागीय अभियंता यांना दोषारोपपत्राचा अहेर देत कुटुंबासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांचा नेतृत्वात अधिकाऱ्यांना घेराव केला.
चिमूर तालुक्यातील डोगर्ला येथे लघुसिंचन विभागामार्फत तलाव व कालव्याकरिता सन २००३ मध्ये ३३ शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत केल्या. या जमिनीवर सन २००५ मध्ये तलावाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लघू सिंचाई विभागाने हस्तांतरीत केल्या. त्या शेतकऱ्यांना १४ वर्षानंतरही एक दमडीही मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आर्थिक मोबदला मिळावा, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायन जांभूळे यांनी लघुसिंचन विभागाला जाग आणण्यासाठी अनेक आंदोलने केली. त्यामुळे या शेतकऱ्यांचा मोबदल्याच्या मागणीला गती आली व लघुसिंचन विभागाने मोबदला देण्याची कारवाई सुरु केली.
मंगळवारला अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता यांना बागंड्याचा अहेर देण्याचा इशारा दिला होता. मात्र बांगड्याच्या अहेराच्या ऐवजी संबंधीत शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना दोषारोपपत्राचा अहेर देत चक्क कार्यालयात कुटुंबीयांसह अधिकाऱ्यांना घेराव केला.
आंदोलनाची दखल घेत उपअभियंता लघुसिंचन यांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत मोबदला देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायन जांभुळे, केशव चौधरी, मेघराज चौधरी, परसराम चौधरी, तुळशिराम चौधरी, हेमराज चौधरी, दिलीप गजभे, संतोष गजभे, योगराज जांभूळे, संजय जांभूळे, बाळकृष्ण जांभूळे, कालीदास जांभूळे, हरी जांभूळे आदी शेतकरी सहभागी होते.