गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला शेतकऱ्यांची भेट
By Admin | Updated: August 7, 2015 00:07 IST2015-08-07T00:07:07+5:302015-08-07T00:07:07+5:30
शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात अभ्यास दौरा करून गांडुळ खताची माहिती जाणून घेतली.

गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला शेतकऱ्यांची भेट
जिवती : शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात अभ्यास दौरा करून गांडुळ खताची माहिती जाणून घेतली.
उदासिनता, सततची नापिकी, सावकारी कर्ज, शेतीची ढासळणारी पोत, रासायनिक खताचा भरमसाठ वापर, जास्त व्यय व लाभ कमी या बाबी डोळ्यासमोर ठेवून लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूरच्या व आईजीएसएसएस यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिविका विकास प्रकल्प अंतर्गत जिवती तालुक्यातील खडकी, चिखली व पुनागुडा या ग्रामपंचायतीमधील १५ गावातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा केला.
तेलंगा राज्यातील इंद्रावली येथील प्रतिष्ठीत शेतकरी दयानंद पाटील यांच्या गांडुळ खत निर्मिती प्रकल्पाला शेतकऱ्यांनी भेट दिली. दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात गांडुळ खत कसे तयार केले जाते, निंबोळी अर्क फवारणी, गोमुत्र फवारणी करुन कापूस, तूर, भाजीपाला व इतर मिश्र पीक चांगल्या प्रकारे घेत असल्याचे यावेळी सांगितले. तसेच गांडुळ खत निर्मिती व विक्री यापासून दर महिन्याला ५० हजार रुपये नफा मिळविण्याचे कौशल्य प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांची प्रगती पाहून एक उत्कृष्ठ शेतकरी म्हणून आंध्रप्रदेश, कनार्टक, महाराष्ट्र व गुजरात राज्यामधून विविध पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले. संस्थेचे संचालक फा. जोबीन ओवेलील यांनी शेतकऱ्यांनी अशा अभ्यास दौऱ्यातून प्रेरणा घेऊन शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व कमी खर्चात शेतीची उपजावू शक्ती गांडूळ खताच्या माध्यमातून प्रयत्न करावा असे सांगितले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)