शेतीच्या विकासासाठी देशातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाचा अवलंब करावा
By Admin | Updated: June 10, 2015 01:43 IST2015-06-10T01:43:16+5:302015-06-10T01:43:16+5:30
इस्त्राईलसारख्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानेच शेती व्यवसायात क्रांती झाली.

शेतीच्या विकासासाठी देशातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाचा अवलंब करावा
कान्हाळगाव (कोरपना) : इस्त्राईलसारख्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानेच शेती व्यवसायात क्रांती झाली. एवढेच नाही तर त्यांनी वेळोवेळी येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. या देशातील सामूहिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्र हेच यशाचे सुत्र आहे. अशा नवनवीन प्रयोगांचा आपल्या देशातील शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास आपली शेती पुन्हा नक्कीच अधिक प्रगत होईल, असे मत केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
ते कोरपना येथे कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, येनबोडी व स्कॉलर्स सर्च अकॅडेमी कोरपनाद्वारा रविवारी आयोजित आधुनिक शेतीवर कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी जीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.बाबासाहेब वासाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, कृषी कल्याणचे कार्यकारी संपादक नितीन कुलकर्णी, जेष्ठ शास्त्रज्ञ सी.डी.मई, डॉ.शरद पवार, प्रशांत वासाडे, रवी बोरकर, दुग्धतज्ज्ञ डॉ.सुनील सहातपुरे, अॅग्रोनामिस्ट यशोदीप गिरसे, संजय वासाडे, डॉ.बसवराज, अभियंता दिलीप झाडे, गोपाळराव सातपुते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. संजय धोटे, अॅड.बाबासाहेब वासाडे, सी.डी.मई, यशोदीप गिरसे, प्रशांत वासाडे, डॉ.शरद पवार, डॉ.सुनील सहातपुरे, डॉ.बसवराज, नितीन कुलकर्णी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रगतशिल शेतकरी अविनाश जाधव, किशोर बावणे, प्रभाकर गेडाम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.अशोक राजूरकर, श्रीधर मालेकर, रमेश मालेकर, पद्माकर मोहीतकर, नारायण हिवरकर, कुंदा झाडे आदी उपस्थित होते. संचालन नितीन कुलकर्णी यांनी तर आभार दिलीप झाडे यांनी मानले. या कार्यशाळेला चंद्रपूर, यवतमाळ व तेलंगणातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)
कोरपना परिसरात सूत गिरणी उभारणीला प्राधान्य देऊ
कोरपना हे कापूस उत्पादक प्रदेश आहे. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी शेतमालाची व कापसाची बाजारपेठ येथे आहे. या भागातील कापूस उत्पादक शेतीला चालना देण्यासाठी सुतगिरणी उभारणीला प्राधान्य देऊ असे मत अहीर यांनी व्यक्त केले.