चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आठ कोटी
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:34+5:302015-07-25T01:14:34+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पर्जन्यमानावर आधारित असून जिल्ह्यातील ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू पिकाखाली आहे.

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आठ कोटी
पीक विम्याची रक्कम मंजूर : ११ हजार ७१६ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राजकुमार चुनारकर खडसंगी
चंद्रपूर जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पर्जन्यमानावर आधारित असून जिल्ह्यातील ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू पिकाखाली आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येत असते. त्यामुळे या सर्व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न घेता येत नाही व शेतकरी कर्जबाजारी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काही मदत व्हावी म्हणून शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू केली. या पीक विम्यातून चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ८ कोटी ९२ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
मागील हंगामात पावसाला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसाची दुबार पेरणी करण्याची वेळ आली. तर नंतर पीक हातात येण्याच्या वेळेत अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या तोंडातील घास हिसवला. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. या नुकसानीमुळे शासनाने दुष्काळग्रस्त भाग म्हणून चिमूर तालुक्याला घोषित केले. ज्या गावातील आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी होती, अशा भागातील शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत देण्यात आली. तथा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी शेतीचा विमा काढला त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१४-१५ च्या हंगामात १२ हजार ८५३ कापूस, सोयाबीन व भात शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेतून पीक विमा काढला. त्यापैकी ११ हजार ७१६ शेतकऱ्यांना पीक विमा मंंजूर करण्यात आला.
त्यामध्ये कापूस ७६२ शेतकरी, भात ९ हजार ३८२ तर सोयाबीनचे एक हजार ५७२ शेतकऱ्यांना मागच्या हंगामात विमा मंजूर करण्यात आला आहे. या ११ हजार ७१६ शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्फतीने ८ कोटी ९२ लाख रुपये पीक विम्याचे मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना त्याच्या बँक खात्यामध्ये काही दिवसात जमा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक कृषी योजनेतून पीक विमा काढला, त्यांचा कृषी विभाग, महसूल विभागाने सर्व्हे केला. त्यांच्या सर्वेक्षणातून विमा सांख्यिकीय तक्त्यानुसार तीन वर्षाची सरासरी काढण्यात आली आहे. मंजूर पीक विम्याची रक्कम येताच, शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- एम.पी. पवार
तालुका कृषी अधिकारी,चिमूर