आॅनलाईनमुळे शेतकरी कागदपत्रापासून वंचित
By Admin | Updated: April 1, 2016 01:36 IST2016-04-01T01:36:17+5:302016-04-01T01:36:17+5:30
या विभागातील तलाठी साझ्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे संपूर्ण रेकॉर्ड तलाठी कार्यालयात असायचे.

आॅनलाईनमुळे शेतकरी कागदपत्रापासून वंचित
आंबोली : या विभागातील तलाठी साझ्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे संपूर्ण रेकॉर्ड तलाठी कार्यालयात असायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार शेतीविषयक आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी संबंधित तलाठ्याकडून मागणीनुसार उपलब्ध व्हायचे. परंतु आता शासनाच्या नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण रेकार्ड आॅनलाईन करण्यासाठी चिमूर शहरातील कार्यालयात तलाठ्यामार्फत जमा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांचे सातबारा, नमुना आठ (अ), फेरफार पंजी व इतर कागदपत्रे ही तलाठ्याकडे तलाठी कार्यालयात असायची. शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार सातबारा नमुना आठ (अ) किंवा फेरफार पंजी ही कागदपत्रे मागणीनंतर तलाठ्याकडून साक्षांकीत केलेली प्रत मिळायची. त्यात नागरिकांची कामे तलाठ्याकडून वेळेवर होऊन शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले होते. आता नवीन युगातील नवीन सरकारच्या धोरणानुसार तलाठी कार्यालयाचे सर्व रेकार्ड आॅनलाईन करण्यासाठी चिमूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. आता ही कागदपत्रे तहसील कार्यालयातून आॅनलाईन प्रणालीनुसार मिळणार असल्यामुळे तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या २५३ गावातील शेतकऱ्यांना सातबारा, नमुना आठ (अ) व फेरफार पंजीतील नोंदी उपलब्ध करण्यासाठी नागरिकांना चिमूर तहसीलच्या पायऱ्या ओलांडाव्या लागतात.
गावखेड्यातून शेतकऱ्यांना आता बरेचसे किमी अंतर कापून सदर रेकार्ड मिळविण्यासाठी चिमूर येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना दिवसभरांच्या मजुरींना मुकावे लागते. (वार्ताहर)