इजराईल पॅटर्नच्या शेतीसाठी शेतकरी तयार
By Admin | Updated: June 2, 2015 01:14 IST2015-06-02T01:14:45+5:302015-06-02T01:14:45+5:30
इजराईल पॅटर्नच्या शेतीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू असून आधुनिक शेतीच्या तंत्रासाठी शेतकऱ्यांची सहल १९ मे रोजी

इजराईल पॅटर्नच्या शेतीसाठी शेतकरी तयार
चंद्रपूर : इजराईल पॅटर्नच्या शेतीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू असून आधुनिक शेतीच्या तंत्रासाठी शेतकऱ्यांची सहल १९ मे रोजी रवाना झाली. यासाठी कृषी जीवन विकास प्रतिष्ठानने पुढाकार घेतला.
कृषी जीवन विकास प्रतिष्ठानतर्फे मागील पंधरवाड्यात ‘आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान’ या विषयावर दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांपैकी एक बल्लारपूर टेक्निकल इन्स्टिट्युट बल्लारपूर येथे तर दुसरी कार्यशाळा राजुरा येथे पार पडली. या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इजराईलच्या पॅटर्नवर शेती व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देणे सुरू केले असून याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांची एक चमू नागपूर व अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २९ मे) रोजी रवाना झाली. विशेष म्हणजे हे शेतकरी मोर्शी व काटोल येथील फलोत्पादन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास या सहलीच्या निमित्ताने करणार आहेत. या चमूला सहकार महर्षी व कृषी जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.
यावेळी बल्लारपूर टेक्निकल इन्स्ट्टियुटचे संचालक संजय वासाडे, माजी जि.प. अध्यक्षा वैशाली वासाडे, जि.प सदस्य अविनाश जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अॅड. वासाडे म्हणाले, मागील आठवड्यात बीआयटी येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. तर राजुरा येथील कार्यशाळेत कोरपना, राजुरा, जिवती येथील शेतकऱ्यांनी इजराईल पॅटर्नच्या शेतीबाबत माहिती जाणून घेतली. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीचा अभ्यास करण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना अमरावती व नागपूर जिल्ह्यात अभ्यासासाठी पाठविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवायचे असेल तर तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. यासोबतच शेतकऱ्यांनी फळबाग योजना, दुग्ध व्यवसाय, नवीन शेतीचे प्रयोग, भाजीपाला उत्पादन, कुक्कूटपालन, शेळी पालन, मेंढी पालन यासारख्या जोडधंद्याची साथ शेती व्यवसायाला दिली पाहिजे. जे शेतकरी हा प्रयोग करीत आहेत, त्यांच्यावर कोणतेही संकट आले तरी त्यांची कंबर मोडत नाही. याची जाणिव शेतकऱ्यांना व्हावी, म्हणूनच ४५ प्रगतशील शेतकऱ्यांची चमू अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील आधुनिक शेतीची पाहणी करतील, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी बीआयटी घेणार पुढाकार - संजय वासाडे
बल्लारपूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. आज बीआयटीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांत काम करीत आहेत. एखादी संस्था तयार झाली तर त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला व्हावयास पाहिजे. हाच उदात्त दृष्टिकोन ठेवून बिआयटी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी पुढाकार घेणार आहे. शेतीवर आधारित अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम इजराईलच्या धर्तीवर सुरू करण्याची योजना बीआयटीने आखली आहे. या उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून शेतीसाठी आवश्यक असणारी तंत्रसामुग्रीही तयार करण्याची योजना आम्ही आखली असून शेतकऱ्यांसाठी आता बीआयटी पुढाकार घेणार, अशी ग्वाही बीआयटीचे संचालक संजय वासाडे यांनी दिली.