सर्वांची साथ, तरच होईल कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST2021-03-10T04:28:34+5:302021-03-10T04:28:34+5:30
जिल्हाधिकारी : ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत संवाद चंद्रपूर : मागील दोन आठवड्यापूर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधितांची ...

सर्वांची साथ, तरच होईल कोरोनावर मात
जिल्हाधिकारी : ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अंतर्गत संवाद
चंद्रपूर : मागील दोन आठवड्यापूर्वी एक अंकी येणारी नवीन कोरोना बाधितांची संख्या आता १२० च्या वर गेली आहे. नागपूर, अमरावती व इतर जवळच्या जिल्ह्यात नवीन बांधितांची संख्या हजारच्या संख्येने आढळून येत आहे. ही धोक्याची घंटा ऐकून नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. नागरिकांना मास्कचा वापर, सुरक्षित अंतराचे पालन व वारंवार हात धुणे या कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वांची साथ मिळाली तर कोरोनावर सहज मात करता येईल असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.
‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भद्रावती येथील स्थानिक मंगल कार्यालयात व वरोरा येथील नगरपरिषदेच्या सभागृत विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संवाद साधला. यावेळी भद्रावती येथील नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर व अर्चना जीवतोडे, तसेच वरोरा येथे नगराध्यक्ष अहतेशामअली, बांधकाम सभापती राजू गायकवाड, पंचायत समिती सभापती धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, यांच्यासह तहसीलदार प्रशांत बेडसे, तहसिलदार मंगेश शिंदोळे, गट विकास अधिकारी मंगेश आरेवार, तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, नगरसेवक तसेच तालुका आरोग्य अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी मध्यंतरी कोरोना बांधिताची संख्या कमी झाल्याने नागरिकांमध्ये गाफीलपणा वाढल्याचे सांगितले.