बल्लारपुरात आजही रझाकाराच्या चर्चा
By Admin | Updated: June 3, 2015 01:30 IST2015-06-03T01:30:33+5:302015-06-03T01:30:33+5:30
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानिक खालसा करुन त्यांचे भारतात विलीन करुन अखंड भारत बांधण्याचे काम केले.

बल्लारपुरात आजही रझाकाराच्या चर्चा
काही नागरिक आजही हयात : अनेकांनी सोसला जुलूम
वसंत खेडेकर बल्लारपूर
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानिक खालसा करुन त्यांचे भारतात विलीन करुन अखंड भारत बांधण्याचे काम केले. सारे संस्थानिक याकरिता तयार झालेत. परंतु, निजामचा संस्थानिक भारतात विलीन व्हायला तयारच होईना. त्याला स्वतंत्रच राहायचे होते. निजामचा कल पाकिस्तानाकडे होता. निजामाजवळ रझाकार नावाचे सैनिक होते. निजामाचे गुणगाण करणे, भारताची यथेच्छ निंदा करुन भारत समर्थक तेथील जनतेवर जुलूम व अत्याचार करणे, हेच या सेनेचे काम! यामुळे रझाकारांची सर्वत्र दहशत होती, ती आजही चर्चिली जाते.
निजाम स्टेट मधील कुणी भारताचे गुणगाण करतो का, घरांवर तिरंगा फडकवितो का, निजामा विरुद्ध बोलतो का, करा त्यांचेवर अत्याचार, जाळा त्यांची घरे असे राक्षसी कृत्य रझाकार करीत असत. निजाम स्टेटची सीमा विदर्भ क्षेत्रातील वर्धा नदीपर्यंत होती. तिकडे मराठवाड्याचा काही भाग निजामात होता. आपल्याकडील या भागापुरते बोलायचे झाल्यास, राजूरा परिसर निजामात येत होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण, या स्वातंत्र्याचा जल्लोष निजाम स्टेट मध्ये केला गेला नाही. तेथील जनतेला तो करु दिला गेला नाही. गांधीजींच्या विचाराच्या प्रचाराला तेथे बंदी होती. आम्ही भारतात विलीन होणार नाही ही निजाम स्टेटच्या बादशहाची आणि रजाकार यांची प्रतिज्ञाच होती.
पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांचे निजाम भारतात विलीन करण्याचे स्वप्न धुळीला मिळवू अशी ते वल्गना करीत. अशाही स्थितीत निजामातील भारत समर्थक भारतात विलीन होण्याच्या दुर्षेने पेटून उठले होते. रझाकारांविरुद्ध लोकांचा असंतोष भडकू लागला होता. भितीच्या ठिकाणी संतापची आग पसरत ‘भारत माता की जय’ आणि ‘म. गांधी की जय’चे नारे गुंजू लागले होते. त्यांचा हा आवाज दडपण्याचा प्रयत्न निजामाच्या सेनेकडून होत होता. निजाम सहजासहजी नमत नसल्याचे बघून सरदार पटेल यांनी कडक पाऊल उचलले आणि निजामाविरुद्ध सैनिकी कारवाई करुन भारतात विलीन केले.
ही कारवाई मराठवाडा सोबतच विदर्भातील शेवटच्या टोकावरील बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील दुधोली रेल्वे पुलाजवळून करण्यात आली होती. दुधोली जवळ सैनिकी छावणी उभारुन नदी पलीकडे रझाकारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते, छावणीतील जवानांना बल्लारपूरवरुन रेल्वेने पाणी, खाण्याचे पदार्थ पाठविले जात असे, तशी आठवण येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी शितलसिंह बजगोती यांनी लोकमतला सांगितले.
ठरलेल्या दिवशी १६ सप्टेंबर १९४८ ला पुलावरुन निजाम विरुद्ध कारवाई सुरु झाली. निजाम स्टेट मधील स्वातंत्र्याविरांनी या कारवाईत भारतीय जवानांना रझाकारांचे अड्डे दाखविण्याला मदत केली. त्यात राजूरा, सास्ती, पेलोरा येथील स्वातंत्र्य प्रेमींचा समावेश होता. या घटनांची आज परत आठवण होण्याचे कारण या घटनांवर बनलेला रझाकार हा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट! रझाकारांची अरेरावी, त्यांची दडपशाही या साऱ्या गोष्टी या चित्रपटात दाखविल्या आहेत, निजामातील लोकांनी रझाकारांना न जुमानता स्वातंत्र्याकरिता कसा कसा लढा दिला याचा प्रसंग आणि संवादातून माहिती देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. यात प्रतिनिधी रूपात एक खेडे दाखविले आहे. ते मराठवाड्यातील की राजूरा कडील हे समजायला मार्ग नाही. कारण, त्या खेड्यातील भाषा कधी मराठवाड्याची तर कधी राजुरा भागात बोलली जाणारी दिसते. निजामावर भारताकडून जी कारवाई करण्यात आली, त्यात काही महत्वाची ठिकाणं आहेत. या चित्रपटाच्या शेवटी त्या स्थळांचा यात उल्लेख करावयाला हवा होता. रझाकारांकडून झालेल्या अत्याचाराच्या घटना राजुरा- बल्लारपूर भागात आजही चर्चिल्या जातात. ही कारवाई बघितलेले काही साक्षीदार आजही हयात आहेत. सिद्धार्थ जाधव, ज्योती सुभाष यांनी व इतर सर्वच कलावंतानी चांगली कामे केली आहेत. हा चित्रपट आजच्या पिढीला त्याकाळचा इतिहास सांगतात.