स्वातंत्र्यानंतरही राजुरा तालुका होता पारतंत्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:32+5:302021-09-17T04:33:32+5:30
बी.यू.बोर्डेवार राजुरा : राजुरा तालुक्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्राम आजही अंगावर शहारे आणणारा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. ...

स्वातंत्र्यानंतरही राजुरा तालुका होता पारतंत्र्यात
बी.यू.बोर्डेवार
राजुरा : राजुरा तालुक्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्राम आजही अंगावर शहारे आणणारा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. तेव्हा राजुरा पारतंत्र्यात होता. तब्बल एक वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाच्या राजवटीमधून स्वतंत्र झाला.
राजुरा हे ब्रिटिश राजवटीच्या टोकावरील शेवटचे गाव होते. राजुराची तेव्हाची लोकसंख्या पाच हजार होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैद्राबाद येथील राजकारणाचा आतंक सुरू झाला. निजाम राजवटीच्या १७ जिल्ह्यामध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते. यात कर्नाटकचे तीन जिल्हे, तेलंगणाचे नऊ जिल्हे आणि महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता. निजामाच्या राजवटीविरुद्ध आवाज उठविला आणि हैद्राबाद येथील काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजाम विरुद्ध आंदोलन सुरू केले. राजुरा तालुका देखील आंदोलनात सहभागी झाला होता. सतत १३ महिने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सेना पाठवून निजामाविरुद्ध कारवाई सुरू केली. भारतीय सेना हैद्राबाद राज्यात येत असल्याची कुणकुण लागताच नवाब उस्मान अली यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. याच दरम्यान भारतीय सेना सेना प्रमुख जी.एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राजुरामध्ये दाखल झाल्या. चार दिवस केलेल्या तीव्र संघर्षानंतर १७ सप्टेंबरला हैद्राबाद सैन्य प्रमुख कासीम रजवी यांनी हार पत्करली आणि हैद्राबाद राज्य भारतात विलीन झाले आणि राजुरा तालुका निजाम राजवटीच्या तावडीतून मुक्त झाला.
बॉक्स
शासकीय सुटी मंजूर करून घेतली
निजाम राजवटीतून मुक्त झाल्यानंतर राजुराचे माजी आमदार वामनराव चटप यांनी राज्य सरकारसोबत पाठपुरावा करून तालुक्यात मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी सरकारी सुटी मंजूर करून घेतली. राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात मुक्ती संग्राम दिवस उत्साहात साजरा केला जातो.
बॉक्स
...तर राजुरा आज पाकिस्तानात असते
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. मात्र सहाशेहून अधिक संस्थानांना त्यांच्या मर्जीनुसार भारत किंवा पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याची मुभा ब्रिटिशांनी दिली. त्यामुळे काश्मीरसोबत पाकिस्तानात राहण्याचा निर्णय निजाम राजवटीने घेतला. परंतु तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या डावपेचामुळे भारत मजबूत राष्ट्र होऊ शकले. निजामाचे नवाब मीर उस्मान अली यांनी पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याची संकेत दिले होते. कदाचित तसे झाले असते तर राजुरा तालुका पाकिस्तानच्या सीमेवर असता.
160921\img_20210916_080305.jpg
फोटो