१२ दिवसानंतरही संसार उघड्यावरच
By Admin | Updated: June 10, 2014 23:56 IST2014-06-10T23:56:36+5:302014-06-10T23:56:36+5:30
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली.

१२ दिवसानंतरही संसार उघड्यावरच
तुटपुंजी मदत : १ कोटी ८० लाखांचे नुकसान
रत्नाकर चटप - लखमापूर
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली. आज १२ दिवसानंतरही आगग्रस्तांचे संसार उघड्यावर आहेत. आम्हाला निवारा कधी मिळेल, अशी आर्त हाक ते देत आहेत.
शासकीय सर्वेक्षणानुसार या आगीमुळे जवळपास एक कोटी ८० लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घरात मुठभर धान्यदेखील उरले नसल्याने हात कुणाकडे पसरावे, असा प्रश्न आगग्रस्तांपुढे उभा ठाकला आहे. सध्या काही सामाजिक संघटना आणि परिसरातील सीमेंट कंपन्या या आगग्रस्तांना मदत करीत आहेत. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने पुन्हा संसाराचा गाडा कसा उभा करायचा, हा प्रश्न आगग्रस्तांना छळत आहे. या वस्तीत शेतमजूर कामगार व लघुउद्योग करणारे कुटुंब मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. मिळेल ते काम करुन दररोजच्या जेवणाची सोय करणे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा या वस्तीतील लोकांचा दिनक्रम आहे. त्यामुळे राहण्यासाठी घर नसल्याने व प्रशासन इतर मुलभूत सुविधा पुरविण्यात उशिर करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले. काही कुटुंबीयांचे नातेवाईक बाहेरगावावरुन रोजच्या जेवणाचा डबा पुरवित आहेत. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक रहिवाशांचे नातेवाईक दूर गावी राहतात. त्यामुळे त्यांच्या भोजनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीच्या काळात चहा, बिस्कीट आणि भोजनाची व्यवस्था सुरळीतपणे केली. मात्र आता या सामाजिक जबाबदारीतून हात झटकले असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
मिळेल तेव्हा खायचे नाही तर उपाशी रहायचे, अशी परिस्थिती आगग्रस्तांची आहे. आगीतून सावरण्यासाठी जळालेले टिनपत्रे, भांडी, हरविलेल्या वस्तू शोधण्यापलिकडे आगग्रस्तांपुढे पर्याय नाही. आतापर्यंत शासनामार्फत खावटी खर्च म्हणून केवळ बाराशे ते दिड हजार रुपये प्रती कुटुंबाला देण्यात आले आहे. इतक्या कमी पैशात पुन्हा संसार उभा करायचा तरी कसा, असा आगग्रस्तांचा प्रश्न आहे.