आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करा
By Admin | Updated: December 23, 2014 23:02 IST2014-12-23T23:02:03+5:302014-12-23T23:02:03+5:30
राज्यातील आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना चंद्रपूरने केली होती. राज्य शासनाने तसे आश्वासन दिले होते.

आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करा
चंद्रपूर : राज्यातील आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना चंद्रपूरने केली होती. राज्य शासनाने तसे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही महामंडळ स्थापन करण्यात न आल्याने शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे. शासनाने आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅटोरिक्षा संघटनेचे विदर्भ सचिव राजेंद्र खांडेकर यांनी केली आहे.
राज्य सरकारने ७ आॅक्टोबर २०१३ रोजी अध्यादेशाद्वारे आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समिती स्थापन केली. अशासकीय सदस्य म्हणून अभ्यास समितीत माझाही सहभाग होता. त्यामुळे समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कामगार आयुक्त, समिती सचिव, सदस्यांनी राज्यातील विविध भागात जाऊन मंडळाविषयी आॅटोरिक्षा चालकांचे म्हणणे, सूचना ऐकून घ्याव्या हा प्रस्ताव अभ्यास समितीत मान्य करून घेण्यात आला. त्यानुसार अभ्यास समितीने विदर्भ-नागपूर, मराठवाडा आदी भागात जाऊन आॅटोरिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळेला त्या त्या विभागातील आॅटोरिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक कृती समितीने घेतली.
या सर्व प्रक्रियेबद्दल आॅटोरिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. समितीने सर्वसाधारणत: दिलेल्या मुदतीच्या आसपास जानेवारीत कामगार मंत्र्यांकडे तर फेब्रुवारीत कामगार सचिवांकडे कल्याणकारी मंडळाविषयी समितीचा अहवाल, कायद्याचे व मंडळाचे स्वरूप सादर केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. समितीने केलेल्या सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, अजुनही आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापीत झाले नाही. नव्या सरकारने यावर तोडगा काढावा, अन्यथा आॅटोरिक्षा चालक रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खांडेकर यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)