जन-वन योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करा

By Admin | Updated: August 23, 2015 01:18 IST2015-08-23T01:18:22+5:302015-08-23T01:18:22+5:30

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वन योजना की वनावरील अवलंबित व मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी गाव समित्यांनी पुढाकार घ्यावा,

Enrich the villages through the Jan-Van Yojana | जन-वन योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करा

जन-वन योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करा

सुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेचा मोहुर्लीत शुभारंभ
चंद्रपूर : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वन योजना की वनावरील अवलंबित व मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी गाव समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मोहुर्ली येथे आज शनिवारी या योजनेचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जे.पी. गरड, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे व सभापती देवराव भोंगळे यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वन विकास योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील १५० गावांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी ५० गावे ताडोबा अंधारी बफर क्षेत्रातील आहेत. या गावांना प्रत्येकी एक लाख या प्रमाणे ५० लाखांचे धनादेश गाव समित्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटन शुल्कातून ताडोबा फाऊंडेशनच्या वतीने गाव विकासासाठी ७१ लाख १० हजार रुपयांचा धनादेश १२ गाव समित्यांना वाटप करण्यात आले. या परिसरातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले.
समृद्ध वन ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी असून या वनाचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. सृष्टीची ही श्रृखंला खंडीत होता कामा नये. तसेच वनावरील अवलंबित्व व मानव वन्यप्राणी संघर्ष कमी व्हावा, या हेतुने वनालगतच्या गावासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरू केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. योजनेतील १५० गावांसाठी पहिल्या टप्प्यात ४० कोटीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Enrich the villages through the Jan-Van Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.