केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:37 IST2017-07-19T00:37:12+5:302017-07-19T00:37:12+5:30
एक महिन्यापूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा होताच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते, ...

केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज
पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ : गतवर्षीची मदत अद्यापही मिळाली नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एक महिन्यापूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा होताच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते, त्यांना खरिप लागवडीसाठी १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र मागणीच नसल्याचे कारण देत आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीच्या १० हजार रूपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
दहा हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेल्यांमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने सर्वाधिक ११२ शेतकऱ्यांना तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केवळ ८ अशा केवळ १२० शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये प्रमाणे १ कोटी २० लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तातडीचे दहा हजार रूपयाचे कर्ज देण्यास बँक तयार आहेत. मात्र शेतकरीच कर्जाची मागणी करीत नसल्याचा जिल्हा उपनिंबधक कार्यालयाने म्हटले आहे. दहा हजार रूपयाचे तातडीचे कर्ज मिळत असले तरी यासाठी शासनाचे निकष कठोर असल्याने कर्जासाठी शेतकरीच मागणी करीत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात सर्वच भागात खरिपाच्या हंगामात कापूस, धान, सोयाबीन, तूर व इतर पिकांची लागवड केली जाते. काही तालुक्यात कापूस उत्पादक तर काही तालुक्यात धान उत्पादक शेतकरी जास्त आहेत. मात्र यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून कापूस पिकासाठी बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप पसरला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भात, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस, मूंग व उडीद पिकांचा समावेश केला आहे. मात्र यावर्षीच्या अधिसूचित पिकाच्या यादीतून कापूस पिकाला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.
पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
पीक विमा योजनेसाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता, त्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतरही अद्यापही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे पीक विमा काढण्याकडे यावर्षी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी कर्जदार शेतकऱ्यांमधून कापूस, सोयाबीन, धान व तूर पिकांसाठी जिल्ह्यातील ६८ हजार ७१९ शेतकऱ्यांनी तर बिगर कर्जदार गटातून ६९ हजार ५७६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. या विमा हप्त्याची रक्कम १२ कोटींच्या घरात आहे. मात्र यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होवूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. यावर्षीच्या पीक विम्याबाबत आकडेवारी मागितली असता, उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
पिकांवर अळीचा प्रादुर्भाव
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून शेतकरी सुखावला आहे. मात्र कापूस, तूर, धान पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतपर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के पेरणी आटोपली असून काही ठिकाणी रोवणीची कामे सुरू आहेत. मात्र जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे असून मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे.
कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम कायम
शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कित्येकदा कर्जमाफीचे निकष बदलले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. कर्जमाफीचा लाभ आपल्याला मिळणार की नाही, याबाबत समजदार व्यक्तींकडून माहिती जाणून घेताना शेतकरी दिसत होते. परंतु कर्जमाफीचे निकष अद्यापही अनेक शेतकऱ्यांना समजले नसल्याने त्यांच्यात कर्जमाफीविषयी संभ्रम कायम आहे.