अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घ्या
By Admin | Updated: August 22, 2015 01:39 IST2015-08-22T01:39:05+5:302015-08-22T01:39:05+5:30
वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी ....

अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घ्या
वनमंत्र्यांना साकडे : शिष्टमंडळाने दिले निवेदन
कोठारी : वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांनी कोठारीत स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमात साकडे घातले. त्यांना विनवनी करून कुटुंबाची होत असलेली वाताहात थांबविण्यासाठी एकाला तरी नोकरीवर घ्यावे अशी विनंती केली. तसेच निवेदनही देण्यात आले.
वनविभागात कार्यरत असताना आपले कर्तव्य बजावत असताना आलेल्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरचा कर्ता पुरूष एकाएकी निघून गेल्याने कुटुंबाची वाताहात होते. घरी दारिद्र निर्माण होवून मुलांचा शैक्षणिक, कौटुंबिक विकास थांबतो. परिणामी तरुण नैराश्यापोटी वाममार्गाने लागतो. त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होते. वनविभागात कार्यरत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनांना नोकरी देण्यासाठी शासन विचाराधिन नाही. अनुकंपाधारकाचे वय निघून जात आहे. तरीही त्यास शासनाकडून नोकरीची संधी दिल्या जात नाही. ेकवळ निरनिराळे नियम बनवून अनुकंपाधारकाची फरफट सुरू आहे. कोणते ना कोणते कारण पुढे करून अनुकंपाधारकांना डावलण्याचा शासनाचा कट आहे. वनविभागात अनेक रिक्त पदे आहेत. ते वेळोवेळी भरले जातात. मात्र अनुकंपाधारकांना १० टक्के राखीव असल्याचे सांगण्यात येते. मात्र आजपर्यंत अनुकंपाधारकांना कुठेही संधी देण्यात आली नाही.
सध्या राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यांना अनुकंपाधारक अनेकदा भेटले. आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अनुकंपाधारकांत तीव्र नाराजी पसरली आहे. वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी अनुकंपाधारकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवून कुटुंबाची होत असलेली वाताहत थांबवून कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेवून कुटुंबाला नवसंजीवनी द्यावी, यासाठी कोठारी येथे झालेल्या कार्यक्रमात अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांना साकडे घातले. (वार्ताहर)