शेतात वीज तारा, खांब कोसळल्याने कामे अडली
By Admin | Updated: June 17, 2017 00:37 IST2017-06-17T00:37:13+5:302017-06-17T00:37:13+5:30
येथून जवळच असलेल्या केम येथे दोन दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या शेतात वीज तारा व खांब कोसळले.

शेतात वीज तारा, खांब कोसळल्याने कामे अडली
लोकमत न्यूज नेटवर्क
टेमुर्डा : येथून जवळच असलेल्या केम येथे दोन दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या शेतात वीज तारा व खांब कोसळले. मात्र वीज कंपनीने अद्यापही वीज तारा व खांब उचललेले नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची अनेक कामे अडली आहेत.
शेतात पडून असलेल्या वीज तारा व खांब हटविण्यात यावे म्हणून तरी शेतकरी वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता शंकर देवगडे व त्याचे सहाय्यक कर्मचारी, लाईनम यांच्याकडे उंबरडे झिजवित आहेत. मात्र ते दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. केम येथील शेतकरी श्रीहरी दातारकर यांच्या वहिवाटीच्या शेतातून टेमुर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून विद्युत तारा गेल्या आहे. मात्र वादळी पावसाने केम शेतशिवारातील अनेक विद्युत खांब व तारा कोसळून पडल्या.
श्रीहरी दातारकर यांच्या शेतात दोन खांब व विद्युत तारा कोसळून असून मशागतीची व पेरणीची कामे अडली आहेत. या संदर्भात वरोरा वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता देवगडे यांच्याशी भ्रमध्वणी वरुन संपर्क साधला असता, आपल्याला अनेक कामे आहेत, असे सांगून उडवाउडवीचे उत्तर दिले. याकडे वीज कंपनीने लक्ष न दिल्यास मोठ्या अपघाताची शक्यता असून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
३३ केव्ही असूनही विजेचा लंपडाव
चंदनखेडा : येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र असून सुद्धा महिनाभरापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. २४ तासात वीज कितीदा जाईल, हे सांगणे कठीण झाले असून उकाड्यासोबतच इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. विद्युत सेवा बाबतीत काही वर्षांपूर्वी वीज विभागाच्या विरोधात नागरिकांनी आमरण उपोषण केले होते. त्याचे फलित म्हणून चंदनखेडा येथे ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले. परंतु आजतागायात विद्युत सेवा योग्यरित्या मिळत नसल्याची ओरड आहे. मे-जून महिन्यात विजेच्या लंपडावाने कहरच केला. वादळी पाऊस झाला की रात्र अंधारातच काढावी लागते. याचा परिणाम व्यावसायिकांसोबतच नळ पाणी पुरवठाला बसत आहे. चंदनखेडा संसद आदर्श ग्राम असूनही ही समस्या निर्माण झाली आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून ही समस्या त्वरीत निकाली काढावी व नागरिकांना वीज सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य चौधरी यांनी केली आहे.
उन्हाळ्यात उच्च तापमानामुळे इन्सूलेटर कमजोर होतात. त्यात पावसाचा मारा झाल्याने इन्सूलेटर तडकून फूटतात. फुटलेले इन्सूलेटर (पंचर) स्पष्ट दिसून येत नाही. या कारणामुळे साधारणत: एक तासाचा ब्रेक डाऊनचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही दिवसातच ही समस्या निकाली होईल.
- के. एन. मेश्राम, कनिष्ठ अभियंता, चंदनखेडा.