Corona Virus in Chandrapur; चंद्रपूर वीज केंद्राची वीज निर्मिती शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 20:59 IST2020-04-06T20:57:53+5:302020-04-06T20:59:28+5:30
लॉकडाऊनचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला जबर फटका बसला आहे. सातपैकी दोन संचावर सुरू असलेली वीज निर्मितीही आता बंद झाली आहे. विजेची मागणीच नसल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा २९२० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्राची शून्यावर आली आहे.

Corona Virus in Chandrapur; चंद्रपूर वीज केंद्राची वीज निर्मिती शून्यावर
अजिंक्य वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोळसा व पाणी मुबलक असताना कोरानामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला जबर फटका बसला आहे. सातपैकी दोन संचावर सुरू असलेली वीज निर्मितीही आता बंद झाली आहे. विजेची मागणीच नसल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठा २९२० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्राची शून्यावर आली आहे.
महाऔष्णिक वीज केंद्रात कोळसा आणि पाण्याचा सहाय्याने विजेची निर्मिती होते. पूर्वी अपूरा कोळसा व पाण्याने वीज निर्मिती प्रभावित होवून वीज केंद्र बंद पडल्याच्या नोंदी आहेत. कोळसा व पाण्याचा अभावाचे संकट वीज केंद्रावर नेहमी घोंघावत असते. मात्र हल्ली वीज केंद्रापुढे विजेच्या मागणीचे भलेमोठे संकट वीज केंद्रापुढे ठाकले आहे. कोरोना या साथीच्या विषाणूंची साखळी तोडण्याकरिता भारतासह महाराष्ट्रात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे विजेवर चालणारे यंत्र, संयंत्र व साऱ्या यंत्रणा बंद पङल्या आहेत. परिणामी विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकूणच याचा जबर फटका चंद्रपूर वीज केंद्राला बसला आहे.
अशी आली वीज निर्मिती शून्यावर
२६ मार्चला २१० मेगावॅटचे दोन तर ५०० मेगावॅटचा एक संच बंद करण्यात आला. त्या पाठोपाठ २७ मार्चला ५०० मेगावॅटचा एक, २९ मार्चला एक, ५ एप्रिलला एक व आज एक असे चंद्रपूर वीज केंद्राच्या सातही संचासमवेत अख्खे चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र आजच्या घडीला बंद झाले आहे.
वीज केंद्राला कोट्यवधीचा फटका
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची २९२० मेगॉवट वीज निर्मितीची क्षमता आहे. मात्र या वीज केंद्राची वीज निर्मिती शून्यावर आली आहे. २०१० मध्ये पाण्याअभावी संच बंद करावे लागले होते. त्यावेळेस नाममात्र एक संच सुरू होता. त्यामुळे वीज केंद्राला कोट्यवधीचा फटका बसणार आहे. विजेच्या मागणीत घट होवून अख्खे वीज केंद्र बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.