उधारीवर भागविणार निवडणूक खर्च!
By Admin | Updated: July 22, 2015 01:28 IST2015-07-22T01:28:19+5:302015-07-22T01:28:19+5:30
जिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

उधारीवर भागविणार निवडणूक खर्च!
लोकमत विशेष
ंखर्च तीन कोटींचा शासनाने दिले एक कोटी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्चाचा हिशेब जुळेना
मंगेश भांडेकर चंद्रपूर
जिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज सादर झाले असून उमेदवारांकडून प्रचाराचा धडाकाही आता सुरू होणार आहे. मात्र ही निवडणूक प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला निधीचा पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जवळपास ३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून केवळ १ कोटी ९ लाख रूपये आतापर्यंत प्राप्त झाले असून उर्वरित निधी लवकर न मिळाल्यास उधारीवरच निवडणूक खर्च भागविण्याची पाळी प्रशासनावर येणार आहे.
कर्मचाऱ्यांना व ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी खासगी वाहने तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या केल्या जातात. मात्र राज्य परिवहन मंडळ नगदी पैसे भरल्याशिवाय बसगाड्या उपलब्ध करून देत नाही. तर खासगी वाहनांचे भाडेही नगदी स्वरूपात देण्याची पाळी येऊ शकते. निवडणुकीच्या कामासाठी शेकडो वाहनांची आवश्यकता भासणार असून यासाठी जवळपास १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे निवडणुकीसाठी तीन कोटी रूपये निधीची मागणी केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ३४ लाख असे १ कोेटी ९ लाख रूपये प्रशासनाला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत.
उर्वरीत निधीही लवकरच उपलब्ध होईल, अशी अशा निवडणूक विभागाची आहे. मात्र शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाने ४ जुलै रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाले. २० जुलै हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल १६ हजार उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे.
उमेदवारांच्या अर्जाची छाणणी करून अंतिम उमेदवार २३ जुलैला कळणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून योग्यरित्या पार पाडली जात आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन पोहचविणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी व्यवस्था करण्यात जिल्हा निवडणूक विभाग व्यस्त आहे. मात्र शासनाकडून मिळालेल्या अपूऱ्या निधीमुळे नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मानधनावर
सव्वा कोटींचा खर्च
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक कर्मचाऱ्याला निवडणूक मानधन म्हणून एक ते दीड हजार रूपये द्यावे लागणार आहे. म्हणजे १० हजार कर्मचाऱ्यांना मानधनापोटी सव्वा कोटी रूपये लागणार आहेत.
बसगाड्यांचा खर्च १४ लाख
निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविणे व इतर साहित्याची ने-आण करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसगाड्या व खासगी वाहने केली जाणार आहे. या वाहनांसाठी तब्बल १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिली आहे.