विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By Admin | Updated: December 13, 2014 01:22 IST2014-12-13T01:22:30+5:302014-12-13T01:22:30+5:30

भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Educational loss of students | विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

चंद्रपूर : भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या शाळेत सद्यस्थितीमध्ये एक ते आठपर्यंत वर्ग आहे. शाळेची पटसंख्या ११८ असून शिक्षक संख्या रेकॉर्डवर सहा आणि प्रत्यक्षात पाच अशी आहे. शासनाच्या नियमानुसार ११८ विद्यार्थ्यांना सहा शिक्षकांची गरज आहे. पण भटाळी शाळेत प्रत्यक्षात पाच शिक्षकच एक ते आठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम करीत आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी येथील एक शिक्षिका निलंबित झाली आहे. त्यामुळे तिचे हजेरीपटावर नाव आहे. शासनाकडून तिला वेतनही मिळत आहे. परंतु ती जागा भरता येत नाही, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे, ही बाब मात्र जि.प. च्या लक्षात येत नाही. शिक्षकाची कमतरता लक्षात घेऊन मागील सत्रापासून शिक्षकाची मागणी करणारे पत्रसुध्दा दिले. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक देतो, असे तोंडी तात्पुरते आश्वासन देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना चूप केले. त्यानंतर शाळा समितीचे सदस्य सुभाष गौरकार यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सुद्धा समायोजनानंतर तुम्हाला एक शिक्षक देण्यात येईल, असे सांगून विषय तेथेच थांबविला. त्याचवेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढेही समस्या मांडण्यात आली. त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्हा परिषदेकडे भटाळी शाळेला एक शिक्षक देण्यात यावा, असे पत्र दिले. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात समायोजन झाले. निलंबित शिक्षिकेच्या जागेवर एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. शाळेत आदेश प्राप्त झाला. परंतु ते शाळेत रूजू झाले नाही. आणि हा प्रवास इथेच थांबून आहे. एकूणच या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक थांबलेले नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून यामध्ये आर.टी.एफ. च्या बट्याबोळ होत आहे. एकीकडे शासन प्राथमिक शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष पुरवून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करीत असल्याचा खोटा गवगवा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र खेडोपाडी शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विदारक चित्र आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक देत नाही, शिक्षक दिला तर त्यांना भारमुक्त करीत नाही. याला कोणते प्रशासन म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेवटी पर्याय उरला नाही नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक मिळाला नाही तर शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सुभाष गौरकार माजी पं.स. सदस्य यांनी दिला आहे. आता जि. प. प्रशासन गावकऱ्यांच्या या इशाऱ्याची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Educational loss of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.