शिक्षण संस्था येणार अडचणीत
By Admin | Updated: December 27, 2014 01:19 IST2014-12-27T01:19:53+5:302014-12-27T01:19:53+5:30
जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये रिक्त असलेल्या जागेवर करण्याचे शासनाचे आदेश आहे.

शिक्षण संस्था येणार अडचणीत
साईनाथ कुचनकार चंद्रपूर
जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये रिक्त असलेल्या जागेवर करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र काही संस्था या शिक्षकांना सामावून घेण्यास तयार नाही. तर दुसरीकडे रिक्त असलेल्या जागेवर संस्था शिक्षकांना सामावून घेत नसेल तर प्रथम मुख्याध्यापकांचे वेतन अडविण्यात येणार आहे. त्यानंतर संस्थेची मान्यता काढण्याचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठविण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. यामुळे शिक्षण संस्था आता अडचणीत येणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक आहे. या शिक्षकांना सामावून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. शासन आदेशानुसार या विभागाने ज्या मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांचे पद रिक्त आहे. त्या संस्थांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना पाठविणे सुरु केले आहे. शिक्षक तसे पत्र घेऊन संस्थांमध्ये जात आहे. मात्र शिक्षण संस्था या शिक्षकांना विविध कारण सांगून सामावून न घेता परत पाठवित आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली असून प्रश्न सुटण्याऐवजी आणखी चिघळत आहे.
याबाबत शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलले आहे.
ज्या संस्था या शिक्षकांना रिक्त असलेल्या जागेवर सामावून घेणार नाही त्या शाळेतील मुख्याध्यापकांचे वेतन अडविण्यात येणार आहे. त्यानंतरही संस्था ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव उपसंचालकाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकांना सामावून न घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील १७ शाळांतील रिक्त असलेले पद यापूर्वीच रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
रिक्त पद असतानाही संस्था या शिक्षकांना सामावून घेण्याचे नाकारत असल्याने नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.