वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात शेतकरी असुरक्षित
By Admin | Updated: December 18, 2014 00:51 IST2014-12-18T00:51:07+5:302014-12-18T00:51:07+5:30
मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला.

वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात शेतकरी असुरक्षित
राजोली : मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. मात्र हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे कठिण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार डोळ्यादेखत होत असूनही कायद्याने शेतकरी हतबल ठरत आहे.
पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करुन संवर्धन करतो. यासाठी त्याला महिण्याकाठी हजारो रुपये खर्च येतो. मात्र वन्यप्राण्याच्या उपद्रवाला शेतकरी रोखण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे.
शेतीचा कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांच्या टोळ्या शेतात घुसून कोवळी रोपे उपटून खातात. थोडीही नजरचूक झाली तरीही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पिक ओरबडतात. हा प्रकार नित्यनेमाचा असल्याने शेतकरी हताश होत आहे.
रानडुकरांचा प्रताप याहूनही भयानक आहे. निर्ढावलेले रानडुकरे पिक तुडवून शेताच्या धुऱ्याबांधाचीसुद्धा नासधुस करतात. शेताभोवती काटेरी तारेचे कुंपन केले तरीही त्याला न जुमानता शेतात मुसंडी मारतात. सुरुवातीला फटाक्याच्या आवाजाने रानडुकरे पळून जात होती. मात्र आता हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाल्याने डुकरे सरळ शेतात घुसून पिकांची प्रचंड हाणी करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करुन शेतकऱ्यांवर हल्ला करुन जमखी करीत आहे. दरवर्षी या घटनातत वाढ होत आहे. अशावेळी जिवाच्या भितीने शेतकरी शेतीची राखण सोडून घरी राहणे पसंत करीत आहे. यामुळे मात्र रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे मिळत आहे.
वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत. तर दुसरीकडे जंगलात दबा धरुन बसलेली हिंस्त्र पशु शेताच्या कडेने चरत असलेल्या गाई, म्हशी, बैल, शेळ्यांवर शेतकऱ्याच्या डोळ्यादेखतत हल्ला चढवून ठार करीत आहेत.
कायदा असल्याने शेतकरी काहीही करु शकत नसून मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्याची मनधरणी करीत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचा तयार नाही. केवळ मोठ्या घटना घटल्या तर अधिकारी घटनास्थळावर येतात. लहानसहान घटनांकडे ते लक्षही देत नाही.
वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देताना शेतकऱ्यांच्या पिकाचा विचार करुन त्यांनी शेतशिवारात किंवा गावाकडे भटकू नये यासाठी उपाय योजना आखायला पाहिजे होती. वनविभाग देत असलेल्या तुंटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घातक कायद्यात आता बदल करुन शेतकऱ्यांनाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. (वार्ताहर)