शक्तिशाली विद्युत टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: May 29, 2014 23:55 IST2014-05-29T23:55:30+5:302014-05-29T23:55:30+5:30
नजीकच्या नांदा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या दुध डेअरी लोकवस्तीत सध्या विद्युत टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. दोन लाख २0 हजार व्हॅट विद्युत क्षमतेच्या या टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात

शक्तिशाली विद्युत टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात
लखमापूर : नजीकच्या नांदा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या दुध डेअरी लोकवस्तीत सध्या विद्युत टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. दोन लाख २0 हजार व्हॅट विद्युत क्षमतेच्या या टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोकवस्तीत टॉवर उभारण्यास गावकर्यांचा विरोध आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने हे टॉवर उभारले जात असून गडचांदूर सबस्टेशनपर्यंत अतिरिक्त विद्युत क्षमतेसाठी टॉवर उभारले जात आहे. यांपैकी बरेच टॉवर परिसरातील शेतकर्यांच्या शेतात उभारले गेले असून त्यांना त्याची भरपाई देण्यात आली आहे. यांपैकी या एक टॉवर १५ ते १६ घरांची वस्ती असलेल्या दुध टेअरी कॉलनीतील किशोर सिंग राठोड व सपन बाला यांच्या घराच्या अंगणात उभारले जात आहे. टॉवरसाठी सदर जागेवर खड्डेही खोदण्यात आले. याआधी या दोन्ही जागा मालकांनी टॉवर उभारण्यास हरकत नसल्याचे लेखी देऊन जागा कंपनीला दिल्याचे समजते. या जागेची किंमत जागा मालकाला देण्यात आली आहे. मात्र या लोकवस्तीत राहणार्या इतर कुटुंबियांना याचा मोठा फटका बसणार असल्याने ग्रामस्थांनी यासाठी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सदर लोकवस्तीत गेल्या १0 ते १५ वर्षांपासून अनेक कुटुंबीय वास्तव्याला आहेत. यापूर्वी सन १९६६ मध्ये या ठिकाणाहून पॉवर लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे काहीजणांना मजल्याचे घर बांधता आले नाही. अशातच पुन्हा या शक्तीशाली टॉवरचे संकट पुढे उभे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोठय़ा क्षमतेच्या टॉवरमुळे बेबी सिंड्रोम, अंगावरील केस उभे होणे, डोकेदुखी, चिडचिडेपणा, आदी दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सततच्या विद्युत प्रवाहामुळे पक्षांच्या प्रजनन क्षमतेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. टॉवरच्या प्रभावामुळे मोबाईल कव्हरेज नसणे, दूरदर्शन न दिसणे, तसेच जनावरांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हे लक्षात आल्याने नागरिकांनी विरोध केला असून टॉवर बाधित लोकवस्तीतील घरांची विक्री करताना किंवा दुमजली घरे बांधताना मोठा अडसर निर्माण होण्याची चिन्हे आहे. काल टॉवरचे बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे येथील नागरिक प्रकाश बोरकर,उपसरपंच बंडू वरारकर, भास्कर लोबने, हरेंद्रसिंग ठाकूर, टी.के. शहा, राम नरेश यादव यांनी विरोध केल्याने सध्या टॉवरचे काम ठप्प झाले आहे. (वार्ताहर)