परवानगी न घेताच केला नाल्याचा उपसा
By Admin | Updated: August 21, 2015 01:22 IST2015-08-21T01:22:23+5:302015-08-21T01:22:23+5:30
नांदा ग्रामपंंचायतीमध्ये आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काम पूर्ण होण्याआधीच इलेक्ट्रॉनिक पोलसाठी ठेकेदाराला दोन लाख रुपये दिल्याचा ठपका....

परवानगी न घेताच केला नाल्याचा उपसा
५७ हजार ९०० रुपयांचे बिल द्यायचे कुणी ? : जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीविरुद्ध तक्रार
नांदाफाटा : नांदा ग्रामपंंचायतीमध्ये आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काम पूर्ण होण्याआधीच इलेक्ट्रॉनिक पोलसाठी ठेकेदाराला दोन लाख रुपये दिल्याचा ठपका नुकताच सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण ताजेच असताना आता जिल्हा परिषद सदस्या सरोज मुनोत यांचे पती अभय मुनोत यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच वार्ड क्र. ६ मधील नाल्याचा नजीकच्या ठेकेदाराला हाताशी धरुन जेसीबीमार्फत उपसा केला आहे. यात ग्रामपंचायतपुढे सदर कामाचे ५७ हजार ९०० रुपयांचे बिल मंजुरीसाठी सादर केले आहे.
दरम्यान, यासाठी आपणावर खोटे आरोप लावून प्रशासकीय कामास अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार सरपंच पूजा मडावी यांनी ठाणेदार गडचांदूर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणामुळेच नुकतीच तंंटामुक्त समिती अध्यक्षांची निवडणूकही तणावाच्या वातावरणात पार पडली असून ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी योग्य मोजणी न करताच तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडल्याची ओरड गावकऱ्यांनी केली आहे. यातच पुन्हा वादाला तोंड फुटून सरपंच पूजा मडावी यांनी हारुन सिद्दीकी आणि अभय मूनोतविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यांना धक्काबुक्की झाल्याचेही सांगण्यात येते.
नांदा ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. नुकताच या गावाला सात लाख रुपयाचा तंटामुक्ती पुरस्कार मिळाला. मात्र स्थानिक राजकीय मंडळींच्या वैयक्तिक स्वार्थामुळे विकास खुंटला आहे. (वार्ताहर)
बिबी ग्रामपंचायतीपुढेही केले
२० हजार रुपयांचे बिल सादर
नांदा व बिबी ग्रामपंचायत हद्दीत येणारा नांदाफाटा वार्ड क्र. ६ मधील नाल्याचा उपसा करण्यात आला. यात नांदासह बिबी ग्रामपंंचायतीकडून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. मात्र बिबी ग्रामपंंचायतीपुढेही अभय मुनोत यांनी काही स्थानिक नागरिकांचे अर्ज घेऊन २० हजार रुपयांच्या बिलास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. सदर प्रस्ताव १५ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या आमसभेत ठेवण्यात आला. ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केल्याचे समजते.