उन्हामुळे घरगुती विजेचा अमर्याद वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:40+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घरघुती विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुढे आली.

उन्हामुळे घरगुती विजेचा अमर्याद वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योग बंद असल्याने पंधरवाड्यात विजेच्या मागणीत मोठी घट झाली. मात्र, चंद्रपूर शहराह जिल्ह्यात कडक उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घरघुती विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पुढे आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अधिक मागणी होत आहे. उन्हाची तीव्रता जशी वाढेल तशी विजेची मागणी पुन्हा जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात विजेची मागणी गेल्या आठवड्यात १४ मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली होती. त्यात दिवसागणिक वाढ होत गेली. उन्हाळ्यामुळे घरगुती विजेचा वापर वाढल्याने मागणीतही सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे विजेची मागणी वाढली असली तरी मेरिट आॅर्डर डिस्पॅचमुळे राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महानिर्मितीच्या चार विद्युत केंद्रांना झिरो शेड्युलमुळे बंद ठेवावे लागले आहे. यात नाशिक, कोराडी, परळी व भुसावळ येथील वीजनिर्मिती केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या खापरखेडा, पारस, चंद्रपूर या तीन वीजनिर्मिती केंद्राबरोबरच उरण गॅस टर्बाईनच्या हायड्रो, सोलरची अशी महानिर्मितीची ३२९९ मेगावॉट वीजनिर्मिती आहे. त्या तुलनेत खासगी क्षेत्रातील जिंदाल, अदाणी, धारीवाल, एस. डब्ल्यू. पी. जी. एल. आणि इतरांची मिळून ४७३४ मेगावॉट वीजनिर्मिती आहे. खासगी क्षेत्रातील वीजनिर्मिती १४०० मेगावॉटने जास्त आहे. सद्या महावितरणाची मागणी १५ हजार मेगावॉटच्या वर आहे. केंद्राच्या अखत्यारीतील वीज स्वस्त असल्याने महावितरणचा कल तेथील वीज खरेदी करण्याकडे असल्याचे दिसते.
एकूणच राज्याची विजेची मागणी १७ हजाराच्या वर गेली असली तरी त्या तुलनेत इतर राज्यांची मागणी कमी असल्याने लॉकडाऊन असेपर्यंत विजेच्या मागणीची स्थिती जैसे थे असण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. म्हणून महानिर्मितीचे संच आहे त्याच स्थितीत वीज निर्मिती करतील. त्यामुळे सद्यस्थितीत बंद असलेले संच अजूनही काही दिवस बंदच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कुलर सुरू झाले
कोरोनाची दहशत सुरू असतानाच काहींनी कुलर लावल्यास प्रशासन कारवाई करणार, अशी अफवा समाज माध्यमातून पसरविण्यात आली होती. परंतू ती फेक निघाल्याने कुलर सुरू झाले आहेत.