पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास संपता संपेना

By Admin | Updated: June 24, 2015 01:32 IST2015-06-24T01:32:41+5:302015-06-24T01:32:41+5:30

अतिशय शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातील कार्यप्रणालीतील बेशिस्तीमुळे स्थानिक महाकाली

Due to the disappearance of police personnel | पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास संपता संपेना

पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास संपता संपेना

रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
अतिशय शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यातील कार्यप्रणालीतील बेशिस्तीमुळे स्थानिक महाकाली पोलीस चौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा वनवास अद्यापही संपला नाही. मागील हिवाळ्यात सुरू झालेले पोलीस चौकीचे बांधकाम अद्यापही अपूर्ण असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना टिनाच्या शेडमध्ये बसून आपले कर्त्यव्य पार पाडावे लागत आहे.
पोलीस खाते हे अतिशय शिस्तीचे असल्याने खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांना मुकाटपणे आहे त्या परिस्थितीशी तडजोड करून हालअपेष्टा सहन करीत कर्तव्य बजवावे लागते. अनेकदा हिच परिस्थिती प्रसंगी त्यांच्या जीवावरही बेतत असते. असे असतानाही वरिष्ठांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठच लक्ष देत नसतील तर कैफियत मांडायची तरी कुणाकडे, या प्रश्नाने महाकाली पोलीस चौकीतील कर्मचारी सध्या अस्वस्थ आहेत.
मागील हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमधे महाकाली चौकीच्या नुतनीकरणासाठी जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर कडाक्याच्या थंडीत टिनाच्या शेडमधे तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवस काढलेत. उन्हाळ्यातील ४८ अंश तापमानात कोणतीही कुरबुर न करता पोलिसांनी कामकाज सांभाळले. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे चौकीतील अनेक महत्वाची कागदपत्र ओली झाली. विषेश म्हणजे सोमवारी ओलाव्या मुळे संपूर्ण चौकीच्या भिंतीत वीज प्रवाह शिरला. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारी तसेच एका तक्रारकर्त्यालाही विजेचा शॉक लागला. मात्र मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेनंतर तातडीने वीज कारागिराला बोलावून तपासणी केली असता, भिंतीत सर्वत्र वीज प्रवाह असल्याचे लक्षात आले. लवकर हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी येथील कर्मच्याऱ्यांमधे भितीचे वातावरण आहे.
हिवाळ्यात नवी चौकी उभारण्यासाठी जुनी इमारत तोडण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यात नव्या चौकीचे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. उन्हाळ्यात तरी आपल्याला नव्या इमारतीत काम करता येईल, या आशेपोटी पोलीस कर्मचाऱ्यांनी थंडीतील दिवस काढलेत. मात्र संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या कासवगतीने हे काम उन्हाळ्यातही पूर्ण झाले नाही. त्यामुळे ४८ अंश तापमानातही तेथील पोलीसांना तापत्या टिनाच्या शेडखालीच काम करण्याची वेळ आली. तेथील पोलिसांचा वनवास येथेच संपला नाही. तर आता पावसाळा सुरू होवूनही हे बांधकाम पूर्ण न झाल्याने भर पावसात त्यांना याच शेडखाली बसून काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहे.

Web Title: Due to the disappearance of police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.