कृषीपदांमुळे कृषी योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:16+5:302021-02-05T07:39:16+5:30
मद्यपी वाहनचालकांवर गुन्हा दाखल चंद्रपूर : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या पाच वाहनचालकांवर चंद्रपूर, दुर्गापूर, घुग्घुस पोलिसांनी कारवाई ...

कृषीपदांमुळे कृषी योजना कागदावरच
मद्यपी वाहनचालकांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या पाच वाहनचालकांवर चंद्रपूर, दुर्गापूर, घुग्घुस पोलिसांनी कारवाई सोमवारी रात्री केली. वाहनचालकांवर कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पठाणपुरातील नाल्या घाणीने तुंबल्या
चंद्रपूर : पठाणपुरा परिसरातील नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नाल्यांमध्ये घाण साचून असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने या वॉर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली.
रस्त्यावर वाहन उभ्या करणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन उभी करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या दहा वाहनचालकांवर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यामध्ये चंद्रपूर सहा व बल्लारपुरातील चौघांचा समावेश आहे. वाहन चालकांवर कलम २८३ अन्वये कारवाई केली.
तुकूम परिसरातील बांधकाम अर्धवट
चंद्रपूर : तुकूम सुमित्रानगर परिसरात नाली बांधकाम न झाल्याने विविध वाॅर्डांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना चिखलातून वाट काढत पुढे जावे लागते. महानगरपालिका प्रशासनाने निधीची तरतूद करून नाली बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वरोऱ्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी
राजुरा: येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीचे गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
निधीअभावी बांधकाम थांबविले
पोंभुर्णा : तालुक्यातील सिमेंट रस्ते बांधकामासाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जात आहे. बहुतेक ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने कामे थांबविल्याचे दिसून येते. अर्धवट कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी केली जात आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाईलधारक त्रस्त
नागभीड : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात; पण त्याचा निपटारा होत नसल्याने ग्राहकवर्ग त्रस्त झाला आहे.
मूल येथे मोकाट जनावरांचा हैदोस
मूल : येथील प्रमुख मार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गायीचा मृत्यू झाला होता.
इंटरनेट सेवा विस्कळीत
कोरपना : तालुक्यात मागील काही दिवसापासून नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी शाळा, ग्रामपंचायत व बँकांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत.
झुडपांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले
भद्रावती : जिल्ह्यातील अनेक वळण मार्गावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. अनेकदा येथे अपघातही घडले आहेत. त्यामुळे अनेकांचे जीव गेले, तर बहुतेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावरील झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
सास्तीत धुळीने नागरिक हैराण
सास्ती : राजुरा-सास्ती गडचांदूर टी पॉईंटवर नागरिकांना कोळशाच्या धुळीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक सुरू आहे. ताडपत्री झाकून कोळशाची वाहतूक करण्याचा नियम असताना या नियमाला वाहतूकदारांकडून बगल दिली जात आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
चिमूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना ही मोकाट कुत्री अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
धोकादायक पुलाला कठडे लावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.
अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, जिवती, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी
गोंडपिपरी : खातेनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश असले तरी शिक्षकासह अनेक कर्मचारी मुख्यालयाबाहेर राहत असल्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. मात्र मुख्यालयी राहत असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व गाव प्रमुखांशी सलगी साधून प्रोत्साहन भत्याची उचल करीत आहेत.
शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडला तर इतर कार्यालयामध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यांवर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
फूटपाथवरील अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : तुकूम रोडवरील बियानी पेट्रोल पंप ते एसटी वर्कशॉपपर्यंत मुख्य रस्त्यावर बऱ्याच दिवसापासून मटन मार्केटचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे हा रहदारीचा परिसर दुर्गंधी व घाणीने वेढलेला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सदर मटण मार्केट इतरत्र हलविण्याबाबत नागरिकांनी निवेदन दिले, मात्र अद्यापही कारवाई झाली नाही. या प्रश्नांकडे मनपाचे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर: शहरालगतच्या पडोली तसेच बंगाली कॅम्प परिसरातील बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक लोक मोठ्या प्रमाणावर येतात.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे जैसे-थे च आहेत. या मार्गावर दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो.