बालमनावर डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजवणे आवश्यक - ज्ञानेश्वर डुकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:55 IST2016-04-25T00:55:34+5:302016-04-25T00:55:34+5:30
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बालमनावर रुजवणे आवश्यक असल्याचे मत

बालमनावर डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजवणे आवश्यक - ज्ञानेश्वर डुकरे
भद्रावती : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बालमनावर रुजवणे आवश्यक असल्याचे मत येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांनी केले. सुमठाना येथील त्रिरत्ननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य जयंतीनिमित्त शुक्रवारी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. कृणाल पथाके होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, प्रणय रायपुरे, मुरली वांढरे, आदी मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ज्ञानेश्वर डुकरे म्हणाले, डॉ. बाबाबासाहेबांनी संविधानातून सर्व प्रकारच्या आर्थिक पिछाडीवर असलेल्या समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे खालच्या स्तरातील नागरिकांनीही आपली विद्वता दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली आहे. हे केवळ बाबासाहेबांमुळेच होवू शकले. त्यामुळे त्याचा आदर्श ठेवून नवीन पिढीने वाटचाल करावी, असे म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी तर शैलेश नगराळे यांनी आभार मानले. (शहर प्रतिनिधी)