वादळी पावसामुळे जिल्हावासी वैतागले

By Admin | Updated: May 5, 2016 01:18 IST2016-05-05T01:18:18+5:302016-05-05T01:18:18+5:30

एरवी उन्हाळ्यात तप्त उन्हामुळे त्रस्त होणारे चंद्रपूर जिल्हावासी यावेळी उन्हाळ्यातील वादळी वारा व अकाली पावसामुळे वैतागले आहेत.

The district will wait for the rain due to the rainy season | वादळी पावसामुळे जिल्हावासी वैतागले

वादळी पावसामुळे जिल्हावासी वैतागले

शेकडो झाडे कोसळली : सततच्या अकाली पावसामुळे नागरिकांचे नुकसान
चंद्रपूर : एरवी उन्हाळ्यात तप्त उन्हामुळे त्रस्त होणारे चंद्रपूर जिल्हावासी यावेळी उन्हाळ्यातील वादळी वारा व अकाली पावसामुळे वैतागले आहेत. वारंवार होणाऱ्या अकाली पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय वनविभाग व वीज वितरण कंपनीलाही याचा फटका बसत आहे. मागील आठवड्यात दोन दिवस चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोमवारी पुन्हा जिल्ह्यात वादळी पाऊस येऊन नागरिकांचे नुकसान झाले. बुधवारीदेखील सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. शेकडो झाडे उन्मळून पडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना अलिकडे ऋतू बदलल्याचा अनुभव येत आहे. हिवाळा आला तेव्हा थंडीचा अनुभव नागरिक घेऊ शकले नाही. बोटावर मोजण्याइतके दिवसच जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली. पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पावसाळा पावसाळ्यासारखा जाणवला नाही. आता उन्हाळ्यात अकाली पावसाची जणू श्रृंखलाच सुरू आहे. खरीप हंगामापासूनच निसर्ग जिल्ह्यावर कोपला आहे, असेच दिसून येते. खरीप हंगामात पाऊस पडायला पाहिजे. मात्र याच कालावधीत पावसाने दडी मारली. सरासरीच्या तुलनेत संपूर्ण पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाऊसच नसल्याने रबी हंगाम करायचा की नाही, या विवंचनेत शेतकरी होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली. त्यांचे पीक हाती येत असताना अकाली पावसाने झोडपले. त्यामुळे गहू, चना व इतर रबी पिके अकाली पावसाच्या तडाख्यात खराब झाली. खरीपात आधीच डोक्यावर कर्ज, रबीत पुन्हा नुकसान, यामुळे शेतकरी चांगलाच खचला.
निसर्गाची अवकृपाच आताही कायम आहे. भर उन्हाळ्यात अकाली पावसाचे थैमान सुरू आहे. केवळ पाऊसच नाही तर गारपीट, वादळी वारा, चक्रीवादळ याचेही तांडव सुरू असल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
मागील आठवड्यात बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती. जिवती, राजुरा तालुक्यातील नागरिकांना ४८ तास अंधारात रहावे लागले होते.
यापूर्वीच राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडून नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजुरा यासह अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळीदेखील नागरिकांचे नुकसान झाले. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले. जिल्ह्यातील चंद्रपूर, घुग्घुस, मूल, नागभीड, गडचांदूर, कोरपना, राजुरा, सावली, सिंदेवाही आदी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. चंद्रपुरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. मूल-चंद्रपूर मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, आज दुपारनंतरच ढगाळ वातावरण तयार झाले होते. (शहर प्रतिनिधी)

शेकडो झाडे उन्मळून पडली
गडचांदूर परिसरात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा मोठा होता. या वादळामुळे गडचांदूर-राजुरा मार्गावरील शेकडो झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. मूल तालुक्यातही वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.

चंद्रपुरात सायंकाळच्या सुमारास पाऊस आल्याने येथील आझाद बागेत आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सोमवारीदेखील असा प्रकार घडला होता. त्यामुळे फिरायला आलेल्या नागरिकांना व बालगोपालांना पावसामुळे बागेतून लगबगीने परत जावे लागले. फुटपाथवरील दुकानदारांची सोमवारप्रमाणे आजही तारांबळ उडाली.

Web Title: The district will wait for the rain due to the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.