विमुक्त भटक्या जमातीचे जिल्हाभर आंदोलन

By Admin | Updated: April 26, 2016 00:37 IST2016-04-26T00:37:03+5:302016-04-26T00:37:03+5:30

राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमाती संघटनेच्यावतीने समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.

The district-level movement of the non-wandering community | विमुक्त भटक्या जमातीचे जिल्हाभर आंदोलन

विमुक्त भटक्या जमातीचे जिल्हाभर आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले : रखरखत्या उन्हातही शेकडो समाजबांधवांचा मोर्चात सहभाग
चंद्रपूर : राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमाती संघटनेच्यावतीने समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी जिल्हा व तालुका मुख्यालयी मोर्चा काढून जिल्हाधिकारी व तहसीलदारांना मागण्याचे निवेदन सादर केले. रखरखत्या उन्हातही मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले आहे.
विमुक्त भटक्या जमाती संघटनेच्यावतीने मागील कित्येक वर्षांपासून शासनाकडे न्याय मागण्या केल्या जात आहे. परंतु राज्यकर्ते न्याय मागण्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
चंद्रपुरात वसंत भवन जटपुरा गेट येथून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमाती समाज विकास मंडळाचे अध्यक्ष आनंदराव अंगलवार यांनी केले. यावेळी शासन विरोधात घोषणा देत मोर्चेकरी बसस्थानक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी भास्कर भोयर, महादेव पोटे, नारायण मोरे, प्रा. योगेश दुधपचारे, कृष्णा नागपुरे, राजेश बडीये, प्रभा चिलके, चंद्रशेखर कोटेवार, विजय बोरगमवार, अशोक राठोड, संतोष लहामगे, रतन शिलावार, एस. एन. शेंडे, चंद्रकांत भुत्तेवार आदी समाज बांधव उपस्थित होते. त्यानंतर एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार-खासदार यांना पाठविण्यात आले.
नागभीड येथे विविध न्याय मागण्यांच्या समर्थनार्थ ४२ जमातींनी एकत्र येवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात भोई, कहार, ढिवर, लोहार, गाडीलोहार, बेलदार, बंजारा, धनगर, ओतारी, गवळी, पारधी, नाथजोगी आदी जमातीतील लोक सहभागी झाले होते. येथील मोर्चाचे नेतृत्व अशोक कोल्हे, आनंद बावणे, गुलाबराव मानकर, दिलीप चंदनबावणे, केशव कोल्हे, श्रीराम गिरी, नागोराव नान्हे, विनोद लोहारे, गिरीधर नगरे, श्रीकांत मंदे, मधुकर डहारे यांनी केले.
ब्रह्मपुरी येथे हुतात्मा स्मारक येथून मोर्चाला सुरूवात झाली. एकलव्य सेना ढिवर भोई समाज संघटना तथा तत्सम विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांचा या मोर्चात सहभाग होता. मोर्चाचे नेतृत्व यशवंतराव दिघोरे, मिलींद भन्नारे, स्वप्नील अलगदेवे, अशोक मारबते, सुभाष सहारे, डॉ. प्रशांत मेश्राम आदींनी केले.
भद्रावती येथे संत झुंगुजी महाराज मठापासून मोर्चाला सुरूवात झाली. अडीच किलोमीटर अंतर पायी चालत मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकले. मोर्चाचे नेतृत्व आशिष कार्लेकर, मनोहर नागपुरे, सुनिल बिपटे, दिलीप नागपुरे, उमाताई नागपुरे यांनी केले.
बल्लारपूर येथे तालुका संघर्ष वाहिनीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने तहसीलदार विलास अहीर यांच्या मार्फत मागणीचे निवेदन शासनाला पाठविले. शिष्टमंडळात संघर्ष वाहिनीचे पदाधिकारी किसनराव घुबरे, विजय गेडाम, अशोक गर्गेलवार, दीपक मांढरे, दिनेश गोंदे, संजय दरवडे, रमेश सोनवने, बाळकृष्ण गोंदे आदींचा समावेश होता.
पोंभुर्णा येथे संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाल्मिकी चौक येथून निघालेल्या मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक दशरथ कस्तुरे, आनंदराव बावणे, दिलीप मॅकलवार, आशिष कावटवार, नगरसेविका सुनिता मॅकलवार, लक्ष्मण सातरे, कैलाश साकलवार, दिवाकर जिडगिलवार, पंकज गदेकार, गणपत सातरे यांनी केले.
कोरपना येथे राकेश राठोड यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव पुरी, विठ्ठलराव कुसळे, संदिप शेरकी आदी समाजबांधवांची उपस्थिती होती. या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी आहे. (लोकमत चमू)

या आहेत मागण्या
भटक्या जमातीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ११ टक्के राजकीय आरक्षण देण्यात यावे, राज्याच्या अर्थसंकल्पात व्हीजेएनटी प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद करण्यात यावी, स्वयंरोजगारासाठी स्वतंत्र आर्थिक मंडळ स्थापन करण्यात यावे, भूमिहीन, बेरोजगारांना घरकूल योजना लागू करण्यात यावी, क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी, जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी, आदी मागण्या आहेत.

Web Title: The district-level movement of the non-wandering community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.