सूक्ष्म, लघु व्यवसायांवर अवकळा; हजारो हात रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:33+5:302021-02-20T05:23:33+5:30
चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार ...

सूक्ष्म, लघु व्यवसायांवर अवकळा; हजारो हात रिकामे
चंद्रपूर : ग्रामीण भागातील दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृहांमधून २०१६ ते २०१७ या वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींना रोजगार मिळत होता. परंतु, गुंतवणुकीसाठी शासनाकडून भांडवल मिळण्यास अनेक अडचणी वाढल्या. ग्राहकांची क्रयशक्ती घटल्याने मागणीला उठाव नसतानाच कोरोनाने पुन्हा संकटात घातली. त्यामुळे सूक्ष्म व लघु व्यवसायांवर अवकळा आली असून हजारो हात रिकामे आहेत.
नऊ तालुक्यांतील रोजगाराची स्थिती तर चिंताजनक असल्याचे वास्तव पुढे आहे.
जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६५ टक्क्यांहून जास्त आहे. प्रामुख्याने ग्रामीण व आदिवासी भागात राहणाऱ्या या समुदायाला शेतीतून वर्षभर रोजगार मिळणे कठीण आहे. थोडेफार शिक्षण घेतलेली नवीन पिढी शेतातील कष्टाची कामे करण्यास कचरते शिवाय, शेतीसमोरही अनेक संकटे उभी आहेत. अशा स्थितीत या भागातील कृषीपूरक व्यवसाय संस्था, दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल्स उपहारगृहांमध्ये सुमारे अडीच ते तीन लाख व्यक्तींना रोजगार मिळत होता. २०१८-१९ या कालावधीत सूक्ष्म व लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांकडून सहजपणे भांडवल मिळत होते. मात्र, त्यानंतर स्थिती बदलली. कोरोनाकाळाने तर समस्यांची तीव्रता पुन्हा वाढविली. त्यामुळे हजारोंना रोजगार पुरविणाऱ्या सूक्ष्म-लघु व्यवसायांवर अवकळा आल्याचे उद्योग विभागाच्या अहवालातून दिसून येते.
कृषी क्षेत्रावर वाढला ताण
सन २०१७-१८ वर्षात २३ हजार ४८२ दुकानांतून २० हजार २२० व्यक्तींना रोजगार मिळाला. व्यापारी संघ ११ हजार ५४० व्यापारी संघातून १३ हजार ३८०, १ हजार ७३ हॉटेल उपहारगृह ४ हजार ७३९ व तत्सम सूक्ष्म व्यवसायातून ग्रामीण भागातील ३८ हजार ४२३ कामगारांच्या हाताला मिळाले. त्यामुळे शेतीवरील ताण हलका झाला परंतु, सध्याचे चित्र उलट झाल्याचे दिसून येत आहे.
२०१८ पासून रोजगारात घसरण
सन २०१८-१९ मध्ये ४ हजार ४७१ दुकानांमधून ११ हजार ५४७ जणांना रोजगार मिळाला. शिवाय, २ हजार ६९८ व्यापारी संस्थांमधून ११ हजार १०१ व्यक्तींना, ४४५ व्यापारी संस्थांमधून १ हजार ४८० व इतर संस्थांकडून २४ हजार ६३६ व्यक्तींना रोजगार मिळाला होता. २०७-१८ च्या तुलनेत १३ हजार ७८७ जणांचा रोजगार हिसकावला. सन २०१८-१९ पासून तर २०२० पर्यंत सातत्याने रोजगारात घट होत आहे.
पाच तालुक्यांतच रोजगाराच्या संधी
दुकाने, तत्सम व्यापारी संस्था, हॉटेल्स व उपहारगृह तसेच तत्सम सूक्ष्म व्यवसाय वर्गवारीत चिमूर, नागभीड, सावली, सिंदेवाही, भद्रावती, पोंभुर्णा, कोरपना, राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे रोजगाराचे मार्ग बंद झाले. मात्र, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल व बल्लारपूर तालुक्यात काही प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
सूक्ष्म उद्योगातील गुंतवणूक (लाखात)
वरोरा १३५, चिमूर १२०, नागभीड ११७, ब्रह्मपुरी १५१, सावली ३०, सिंदेवाही ५१, भद्रावती ११४, चंद्रपूर १५६८, मूल ६१६, बल्लारपूर १०४, पोंभुर्णा ७५, कोरपना ६२, राजुरा ७४, गोंडपिपरी ४३ व जिवती तालुक्यातील सूक्ष्म उद्योगांसाठी ३६ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये गुंतवणूक घटल्याने सूक्ष्म उद्योगांमध्ये रोजगार पुरविण्याची क्षमताही कमी झाली नाही.