शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:39 IST2017-07-19T00:39:24+5:302017-07-19T00:39:24+5:30

जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली.

Dictate to the ruling and opponent of education | शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली

शिक्षणावरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली

जिल्हा परिषदेची सभा : अनेक प्रश्नांवर मोघम उत्तरे दिल्याचा विरोधकांचा आरोप
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या केवळ शिक्षण विभागातील विविध प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली. या सभेत शिक्षण विभागाशी निगडीत अनेक प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली. सत्ताधारी मोघम, चुकीचे उत्तरे देऊन विषय पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. अधिकारीही सदस्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती सादर करीत होते, असा आरोप विरोधक करीत होते. त्यामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. सत्ताधारी गटाच्या एका महिला सदस्याने ‘अधिकाऱ्यांवर तुमचा वचक नाही’ असे पदाधिकाऱ्यांनाच सुनावल्याने वातावरण आणखीणच तापले.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी मागील अनेक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार केवळ शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत सदस्यांना दिलेल्या इतिवृत्तातील माहिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती यात मोठी तफावत होती. ही बाब विरोधी सदस्यांच्या निदर्शनास येताच सदस्यांनी आक्षेप नोंदविला.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८५ शाळा असून, यापैकी १ हजार ९६ शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, क्रीडा विभागाकडून पुरविण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रशासनाकडे कोणतीही नोंद नसल्याचे आढळून आले. तर ८५८ शाळांमध्ये क्रीडांगण आहेत, तर ७२७ शाळा क्रीडांगणाविना असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, असे असतानाही या शाळांना क्रीडा साहित्य पुरविण्यात आले आहे. याची माहितीच शिक्षण विभागाला नसल्याचे सभेत स्पष्ट झाले. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनीही चूक मान्य केली,
जिल्ह्यातील १ हजार ५८५ शाळांपैकी केवळ २६ शाळांमध्येच शौचालय नसल्याचे इतिवृत्तात दाखविण्यात आले होते. त्यामुळे जर जंगलालगतच्या शाळांपैकीच ४२ शाळा शौचालयाविना असताना एकूण शाळांपैकी केवळ २६ शाळाच या सुविधेपासून वंचित कशा, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करून आकडेवारी चुकीची असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३१२ शाळा दाखविण्यात आले आहे. मात्र, त्याची यादी देण्यात आली नाही. संरक्षक भींतीबाबतही चुकीची माहिती देण्यात आली. वरिष्ठ वेतनश्रेणीचेही ७३७ प्रकरणे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असून यावर काय कार्यवाही केल्याचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला.

‘लोकमत’च्या वृत्तावर सभागृहात चर्चा
‘खिशात पास तरीही, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास’ असे वृत्त व ‘विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला’ या विषयावर सोमवारी ‘लोकमत’ने विशेष पान काढले होते. याबाबत जिल्हा परिषद काँग्रेसचे उपगटनेता खेमराज म्हरस्कोल्हे यांनी सभागृहात ‘लोकमत’ वृत्तपत्र उंचावून प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अध्यक्षांनी एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

सत्ताधारी गटाच्या महिला सदस्याकडून घरचा अहेर
शिक्षण विभागातील ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते, त्या एकाही प्रश्नाची माहिती अचूक देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती स्तरावर अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप करीत सावली तालुक्यातील भाजपच्या एका महिला जि.प. सदस्याने पदाधिकाऱ्यांना ‘अधिकाऱ्यांवर तुम्हचा वचक नाही’ असे खडेबोल सुनावले. त्यामुळे वातावरण तापले होते.

Web Title: Dictate to the ruling and opponent of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.