स्थानिकांच्या नशिबी प्रदूषणच

By Admin | Updated: March 24, 2015 00:41 IST2015-03-24T00:41:57+5:302015-03-24T00:41:57+5:30

कोरपना तालुक्यात गेल्या ३०-३५ वर्षांपासून अनेक सिमेंट उद्योग सुरू आहेत. त्याची संख्या वाढत जावून आता चार सिमेंट उद्योग या तालुक्यात कार्यरत आहेत.

Destruction of locals is pollution | स्थानिकांच्या नशिबी प्रदूषणच

स्थानिकांच्या नशिबी प्रदूषणच

रत्नाकर चटप  नांदाफाटा
कोरपना तालुक्यात गेल्या ३०-३५ वर्षांपासून अनेक सिमेंट उद्योग सुरू आहेत. त्याची संख्या वाढत जावून आता चार सिमेंट उद्योग या तालुक्यात कार्यरत आहेत. यातच आता नव्याने वेकोलि कोळसा खाणीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध असल्याने देशी-विदेशी उद्योजक या परिसरात येत आहे. मात्र यामुळे प्रदुषणाची समस्या बिकट होत चालली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उद्योग कार्यान्वित करण्याची प्रक्रीया सुरू करताना संरक्षणाचे व संवर्धनाचे आश्वासन स्थानिकांना दिली जाते. शासनाच्या निकषातही ते दिसतात. परंतु प्रत्यक्षात हा प्रश्न गंभीर होत असताना मात्र कंपन्या याकडे कानाडोळा करीत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. लोकांचे राहणीमान सुधारले. काही हातांना रोजगार मिळाला हे जरी सत्य असले तरी समाजातील इतर घटकांना या कंपन्यांचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज तालुक्यात मुख्य रस्त्याची अवस्था दयनिय आहे. काही गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे. आरोग्य यंत्रणा आॅक्सीजनवरच आहे. तर दुसरीकडे प्रदूषणाचा शेतपिकांवर मोठा परिणाम होत असल्याने अन्नदाता चिंतेत आहे. तालुक्यात राजुरा, गडचांदूर, कोरपना, आदिलाबाद, गडचांदूर, भोयरगाव, धानोरा, कोरपना कोडशी, वणी, देवाळा, गडचांदूर, नांदाफाटा, वनोजा, राळेगाव असे मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरदिवशी एक हजाराहून अधिक जडवाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे तालुक्यात अपघाताच्याही घटना सातत्याने घडत असतात.
काही कंपन्यांनी पाच गावे दत्तक म्हणून घेतली आहेत. त्याठिकाणी योजनाही सुरू केल्या आहे, तर काही ठिकाणी नावापुरत्याच योजना राबवून कागदी घोडे नाचविताना दिसत आहेत. तालुक्यात वर्धा पकडीगुड्डम व अंमलनाला धरण पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. परंतु या कंपन्यांमार्फत पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात नद्यांना पाणी राहात नाही, तर आपल्या सोयीनुसार पाणी उपसून आपले उद्योग चालवित आहेत.
यातच आता गाडेगाव या गावशिवारात कोळसा खाणीला परवानगी मिळाली. त्यामुळे वर्धा नदीवर पुन्हा एका उद्योगाचा भार वाढला आहे. काही शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या बदल्याच नोकऱ्या मिळाल्या तर शेतीवर आधारित व्यापारी, मजूर व भुमिदिनांचा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यात नांदाफाटा, गडचांदूर, उपरवाही, नारंडा या गावामध्ये व मागावालगतच्या परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत.
कंपन्यांनी तालुकाच दत्तक घ्यावा
कंपन्यांच्या स्थापनेनंतर कंपनी परिसरातील काही गावे दत्तक घेतली आहेत. इतर गावे ‘जैसे थे’च आहेत. गावातील रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न कायम आहे. यासाठी शासनाकडून योजना राबविली जात असली तरी प्रत्यक्षात योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तालुक्यात शासकीय कार्यालये आहेत; पण अधिकारी नाहीत, दवाखाने आहेत पण डॉक्टर नाही’. नळयोजना आहेत पण पाउी नाही, अशी परिस्थिती आहे. तेव्हा इथल्या खनिज संपत्तीवर लाखो रुपयांचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी एक तालुका दत्तक घ्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.
गडचांदूर-आदिलाबाद रेल्वे धावणार कधी?
तालुक्यातील गडचांदूर - आदिलाबाद रेल्वे मार्गाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे स्वस्त दरात प्रवास करायला मिळणार, अशी अपेक्षा करणाऱ्यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. साधारणत: ६८ किलोमिटरच्या या मार्गासाठी राज्य व केंद्र शासनाने भार उचलावा, अशी अपेक्षा असताना तत्कालिन खासदार नरेश पुगलिया, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, सुभाष धोटे यासाठी प्रयत्न केले. यात सुभाष धोटे यांनी मागील शासन काळात काही निधीची तरतूद शासनामार्फत करून घेतली. परंतु केंद्र सरकारने अद्यापही या मार्गाला हिरवी झेंडी दाखविली नाही. जिल्ह्यात आता दोन-दोन मंत्री, विदर्भाचाच मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारही एकाच पक्षाचे आहेत. या लोकप्रतिनिधींनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
दूषित पाण्याचा पुरवठा
तालुक्यात उद्योगांमुळे दूषित पाण्याचा पुरवठा काही गावांमध्ये होत आहे. त्यातच काही उद्योगांचे पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावकऱ्यांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्याचबरोबर फ्लोराईडयुक्त पाणी अनेक गावांत आजही नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
परप्रांतीयांचा मोठा भरणा
उद्योगांच्या उभारणीनंतर स्थानिक बेरोजगारांना रोजगार आशा असते. मात्र कंपन्यामध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा मोठा भरणा केला जात आहे. उद्योगात कामगारांची भरती करताना स्थानिक रोजगारांना नियमित काम मिळत नसल्याचे सांगण्यात येते.
वाहतुकीचा प्रश्न गंभीर
तालुक्यात मुख्य रस्त्यावर व औद्योगिक गावांमध्ये जडवाहने रस्त्यावरच उभी केली जात आहे. त्यामुळे अंबुजा, वनोजा, नारंडा, भोयेगाव आदी मार्गावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत.

Web Title: Destruction of locals is pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.