हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
By Admin | Updated: March 6, 2016 00:32 IST2016-03-06T00:32:37+5:302016-03-06T00:32:37+5:30
फेब्रुवारी महिन्यात सतत तीन दिवस आणि शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
अवकाळी पाऊस : शासनाकडून नुकसानभरपाईची अपेक्षा
चंद्रपूर : फेब्रुवारी महिन्यात सतत तीन दिवस आणि शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच गारपीट आणि वादळही सुटले. परिणामी हातात येणारा रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या अवकाळी पावसाचा जवळजवळ सर्वच तालुक्यात थोडाअधिक फटका बसून हजारो हेक्टरवरील रबी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५० ते ६० टक्के उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. लागवड खर्चही न निघाल्याने शेतकरी यंदा कर्जफेड करू शकला नाही. अशातच शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसऱ्यांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, मूग, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.
मागील वर्षी जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना रबीतून उत्पादनही बऱ्यापैकी झाले होते. यावर्षीदेखील एक लाखांहून अधिक हेक्टरवर रबीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. रबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र कृषी विभागाचे हे नियोजन शेतकऱ्यांनी फोल ठरविले. यावर्षी रबीत मागील वर्षीच्या तुलने निम्म्यावरही पिकांची पेरणी झाली नाही. जिल्ह्यात केवळ ६५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली.
यंदा पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊसच झाला नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती होती. ती खरीही ठरली.
रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागली. मोठ्या आशेने आणि हिंमतीने पिकांची जोपासणा करीत शेतकऱ्यांनी कसेबसे पिक पिकविले. त्यातही यंदा हिवाळा सुरू होऊनही थंडी पडली नाही. अगदी शेवटी जानेवारी महिन्यात थोडीफार थंडी पडली. मात्र तेही काही दिवसात लोपली. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांची वाढच खुंटली.
आता शेतकऱ्यांच्या हातात रबी पिके येऊ लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी गहू, लाखोळी तोडून शेतातच वाळू टाकली होती. मात्र मध्येच फेब्रुवारी महिन्यात आणि आता काल अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.
काल शुक्रवारी विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, जिवती, मूल, सावली, चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर, नागभीड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. तर भद्रावती, ब्रह्मपुरी तालुक्यात ढगाळ वातावरण व वादळ सुटले होते. या पावसामुळे पुन्हा रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप सर्वेक्षण केले नसले तरी हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)
तत्काळ सर्वेक्षण व्हावे
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रबी पिकांचे नुकसान झाले. काही पिके कापून शेतातच ढिग करून असल्याने तेदेखील पाण्यामुळे खराब झाले. शेतकऱ्यांच्या आमराईतील मोहरही वादळामुळे झडला. या नुकसानीचे कृषी किंवा महसूल विभागाने तत्काळ सर्वेक्षण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.