निकिताने केली प्रतिकूलतेवर मात
By Admin | Updated: June 9, 2015 01:33 IST2015-06-09T01:33:17+5:302015-06-09T01:33:17+5:30
घरी अठराविश्व दारिद्र्य, वडील मजुरीचे काम करतात, आईही घरकाम करणारी; आईवडीलांचे शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंतचे.

निकिताने केली प्रतिकूलतेवर मात
दहावीत मिळविले ९२ टक्के मार्क : कोणत्याही विषयाची नव्हती शिकवणी
अनेकश्वर मेश्राम ल्ल बल्लारपूर
घरी अठराविश्व दारिद्र्य, वडील मजुरीचे काम करतात, आईही घरकाम करणारी; आईवडीलांचे शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंतचे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता केवळ जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने ती दहावीच्या परिक्षेला सामोरे गेली. सोमवारला लागलेल्या दहावीच्या निकालात निकीता कवडू लभाने हिने ९२.२० टक्के मार्क मिळवून भरारी घेतली. तिने प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता सर्वच विषयात प्रावीण्य मिळविले.
बल्लारपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात ती कुटुंबासोबत राहत असून दिलासाग्राम कॉन्व्हेंटची निकीता ही पाचव्या वर्गापासून विद्यार्थीनी आहे. कवडू लभाने यांच्या कुटुंबात पत्नी निलिमा, मोठी मुलगी निकीता व तिचा लहान भाऊ असे चौघांचे मर्यादित कुटुंब आहे. निकिताचे प्राथमिक शिक्षण नगर पालिकेच्या शाळेतच झाले.
शैक्षणिक सत्रा दरम्यान निकीताही वर्गात नेहमी पहिल्या दहा विद्यार्थ्यांत असायची. दहावीच्या परिक्षेच्या निकालातही ती दिलासाग्राम कॉन्व्हेंटमध्ये पहिल्या दहा विद्यार्थ्यात तिचा समावेश आहे. तिने दहावीच्या परिक्षेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला बाजुला सारुन यश संपादन केले. तिला इंग्रजी विषयात १०० पैकी ८४, मराठी १०० पैकी ९१, हिंदी १०० पैकी ९१, गणित १०० पैकी ९८, विज्ञान १०० पैकी ९५ तर सामान्य विज्ञान विषयात १०० पैकी ८६ गुण मिळविले आहे. निकीताची भरारी सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई निलिमा, वडील कवडू व दिलासाग्राम कॉन्व्हेंटच्या शिक्षकवृंद व मुख्याध्यापकांना दिले.
वडिलांनी केली होती प्रवेशासाठी विनंती...
बल्लारपूर शहरातील दिलासाग्राम कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आटापिटा करावा लागतो. माझ्या मुलीला प्रवेश द्या, म्हणून वडील कवडू यांनी व्यवस्थापनाला चक्क विनंती केली होती. येथे कवडुजी परिस्थितीआड येत होती. मात्र व्यवस्थापनाने निकीताच्या पाचवीतील प्रवेशासाठी तोडगा काढला. प्रवेश परिक्षेत यशस्वी झाल्यास निकीताचा पुढचा शैक्षणिक प्रवास सुरू होणार होता. त्याचवेळी दिलासाग्राम कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापनाने तिची लेखी परीक्षा घेतली. प्रवेश परिक्षेत निकीताने १०० पैकी ८० मार्क प्राप्त करून कुशाग्रबुद्धीची जाणीव करून दिली. सर्वसामान्य घरच्या विद्यार्थ्यानीला संघर्षमय परिस्थितीची जाणीव त्याच वेळ झाली होती.
दृढ निश्चयातून गाठले यश
दिलासाग्राम कॉन्व्हेंट मधील निकीताचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. शिक्षणाच्या आड परिस्थिती येऊ द्यायची नाही, असा दृढ निश्चिय करुन शाळेत शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावर तिने भर दिला. वडिलांच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या निकिताने दहावीत सुद्धा कोणत्याही विषयाची शिकवणी लावली नाही. तिचे वडील कवडू हे घरोघरी जाऊन इलेक्ट्रीक फिटींगचे कामे करतात. त्याच भरोशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यामुळे शिकवणी वर्गासाठी पैसा कसा देणार याची पुरेपुर कल्पना निकीताला होती.